मुंबई : मागच्या वर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा देशभरात चांगलाच गाजला होता. त्यांच्या दौऱ्याला भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी अयोध्येत राज ठाकरेंना प्रवेश करू देणार नाही, असे जाहीर आव्हानच दिल्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आता वर्षभरानंतर पुन्हा एकदा बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंविषयी आपले मत व्यक्त केले आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात उत्तर भारतीयांबाबत राज ठाकरेंनी केलेल्या विधानांबद्दल जाहीर माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही, अशी घोषणाच बृजभूषण सिंह यांनी केली होती. त्यामुळे काही दिवस वातावरण गरम झाले होते. आता त्याच बृजभूषण सिंह यांनी आपलं राज ठाकरेंशी वैयक्तिक भांडण नव्हतं, त्यांनी एक प्रकारे उत्तर भारतीयांचा सन्मानच केला आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
उत्तर प्रदेशचे भाजपा खासदार बृजभूषण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, राज ठाकरेंच्या प्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली आहे. यात आता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध नसून ते आले तर त्यांचं स्वागतच आहे, असे बृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. याविषयी बोलताना, “राज ठाकरेंशी माझं काही वैयक्तिक भांडण नाही. त्या वेळी मी उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावर म्हटलं होतं की त्यांनी माफी मागावी आणि मग इकडे यावं. पण त्यांनी इथे न येऊन एक प्रकारे आमचा सन्मान केला आहे. त्यामुळे मोठा वाद टळला. आता मला वाटतं की ते जर आले तर मला कोणताही आक्षेप नाही. कुणालाच कोणता आक्षेप नाही”, असे बृजभूषण सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी “तेव्हा वाद टाळून त्यांनी उत्तर भारतीयांचा एक प्रकारे सन्मानच केला. ते जरी स्वत:च्या तोंडून खेद व्यक्त करू शकले नाहीत किंवा दिलगिरी व्यक्त करू शकले नाहीत तरी न येणं हा एक प्रकारे उत्तर भारतीयांचा सन्मानच आहे. आता मला राज ठाकरेंच्या बाबतीत काहीही म्हणायचं नाही. जशी अयोध्या आमची आहे, तशीच ती राज ठाकरेंचीही आहे. त्यांनी इकडे यावं, त्यांचं स्वागतच आहे”, असेही बृजभूषण सिंह यावेळी म्हणाले.