नवी दिल्ली : राजस्थान विधानसभा निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि नेते सचिन पायलट यांच्यातील वाद आता जगासमोर येत आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सचिन पायलट यांनी गेहलोत सरकारला अडचणीत आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सचिन पायलट हे एक दिवसीय उपोषण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सचिल पायलट यांची उपोषणाची सुरुवात हे नाराजी नाट्यापासून झाली आहे. 2018 साली राजस्थानमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत काँग्रेस सत्तेत आल्यानंतर ज्येष्ठ नेते अशोक गहलोत आणि तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून अंतर्गत नाराजी झाली होती. पण, त्यावेळी केंद्रीय नेतृत्वाने अशोक गहलोत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. तर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानाले लागले आणि राज्यात नाराजीनाट्याची ठिणगी पडली.
2018 ते जुलै 2020 पर्यंत सरकार व्यवस्थित काम करत होते. पण, जुलै 2020 मध्ये सचिन पायलट यांनी बंड केले. अनेकांना वाटलं की, मध्य प्रदेशप्रमाणेच राजस्थानमध्येही काँग्रेस सरकार कोसणार पण, अशोक गहलोत यांच्या राजकीय चातुर्यामुळे सचिन पायलट यांचे बंड मोडित निघाले. याच बंडामुळे सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवले. तेव्हापासून आजपर्यंत अनेकवेळा पायलट यांनी आपल्याच सरकारला धारेवर धरले. आता तर थेट सरकारविरोधात उपोषणाचीच घोषणा केली.
11 एप्रिलला ते लाक्षणीक उपोषण करणार आहेत. राजस्थानमध्ये याचवर्षी विधानसभेची निवडणूक होईल. त्यासाठी जेमतेम सहा-सात महिनेच उरलेत अशातच जर काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर 200 जागा असलेल्या विधानसभेत पुन्हा एकदा शंभरचा आकडा गाठावा लागेल आणि जर राज्यातल्याच दोन प्रमुख नेत्यांमध्ये असाच संघर्ष सुरु राहिला तर काँग्रेसला पुन्हा एकादा सत्ता मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागू शकतो.