मुंबई – राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून “अजित पवार’ यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत.
अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता या सर्व चर्चांना अजित पवार यांनी पूर्ण विराम दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहे. महाराष्ट्राला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.
दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राज ठाकरे म्हणतात की…!
“आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार? या आशयाचे ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.