मुंबई – विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने राज्याला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.अजित पवार देखील भाजपसोबत सत्तेमध्ये सामील झाल्याने राज्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलणार आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली बाजू स्पष्ट केली.
पक्षाचे बहुसंख्य आमदार माझ्यासोबत आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी आहोत असं यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच राजकीय पक्ष आणि चिन्ह माझ्याकडे आहे असं देखील पवार म्हणाले. आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपासोबतही जाऊ शकतो. बहुतांश आमदार, नेत्यांना आमचा निर्णय मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालो आहोत असं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नऊ वर्ष कारभार सुरु आहे. ते मजबुतीने देशाला पुढे घेऊन जात आहेत. आपणही त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असं वाटल्याने सरकारसोबत आल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील सर्व निवडणूका राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढवणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार देखील आता उपमुख्यमंत्री बनले आहे. अजित पवार हे पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहे. यामुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत.