मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी होताना दिसून येत आहे. त्यातच आज याच मुद्द्यावरून विधानसभेत सीमावादावर प्रस्ताव मांडण्यात येणार होता. मात्र आजही हा प्रस्ताव मांडण्यात येणार नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
आजच्या विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात विरोधकांनी सीमावादाच्या मुद्द्यावरून केली. दरम्यान, सीमावादावर विरोधकांनी प्रस्ताव मांडण्याची मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात उपस्थित नसल्याने हा प्रस्ताव उद्या म्हणजेच मंगळवारी सभागृहात मांडणार असल्याची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून बोलावणे आल्याने ते तातडीने दिल्लीला रवाना झाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रस्ताव उद्या मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सरकारच्या या भूमिकेवर विरोधकांनी गोंधळ घालून सभात्याग केला.