मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेमध्ये हजेरी लावली. हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आज सुरु झाला आणि राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली. खासदार संजय राऊत यांनी आधीच गौप्यस्फोटाचा इशारा दिला असल्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होत. सीमावादावर बोलताना उद्धव ठाकरे यावेळी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बेळगाव निपाणी कारवार हा सीमाभाग केंद्र शासित करा अशी थेट मागणी यावेळी ठाकरेंनी सभागृहात केली.
मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत परंतु ते दिल्लीत महाराष्ट्राची बाजू भक्कपणे मांडणार का ? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभागृहात उपस्थित केला. तसेच ठराव.. ठराव म्हणजे नेमका कोणता ठराव आपण मांडणार आहोत. माझं मत आहे हा ठराव असाच असला पाहिजे की,जोपर्यंत हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तोपर्यंत हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित झालाच पाहिजे ही मागणी या ठरावाद्वारे आपण केली पाहिजे आणि केंद्राकडे पाठवली पाहिजे.
ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
हा भाषावार प्रांतरचनेचा विषय नाही. हा माणुसकीचा लढा आहे.
आपण कन्नड भाषिकांवर अन्याय केला नाही. पण कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर सातत्याने अत्याचार करत आहे. त्याविरोधात आपण भूमिका घेणार आहोत की नाही?
तुम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या तेव्हा तुम्ही आमच्यासोबत होता. आता सीमापार गेला. आता तिकडे गेला म्हणून बोलायचं नाही असं नाही.तेव्हा लाठ्या खाल्ल्या म्हणून आता गप्प बसायचं असं काही नाही.
सीमावादाची परिस्थिती कोणी बिघडवली? हा प्रश्न कोर्टात गेल्यानंतर एक एक पाऊल कोणी पुढे टाकलं?
सीमावादाच्या प्रश्नी सभागृहातील सदस्यांचं एकमत झालंय, त्याबद्दल पक्षभेद बाजूला ठेवून अभिनंदन करतो.
हा दोन भाषांचा लढा नाही.आपण सरकारबाबत बोलू शकतो. पण हा माणूसकीचा लढा आहे.