नवी दिल्ली – विश्वविजेतेपद मुष्टियुद्ध स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत सहभागी झालेल्या भारतीय संघावर नामुष्की आली आहे. बोली लावताना जमा करावी लागणारी रक्कम वेळेत न भरल्याने भारताएवजी सर्बियाला यजमानपद बहाल करण्यात आले आहे.
तीन वर्षांपूर्वीच या स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताने बोली लावली होती व अर्जही दाखल केला होता. त्यासाठी 500 डॉलरची रक्कम जमा करावी लागणार होती. ती वेळेत भरण्यात भारताकडून दिरंगाई झाली व स्पर्धेच्या यजमानपदावर पाणी सोडावे लागले आहे.
2017 साली भारताने या यजमानपदासाठी प्रयत्न सुरू केले. प्रत्येक स्पर्धेच्या यजमानपदासाठी एक नियमावली असते. जागतिक मुष्टियुद्ध संघटनेने भारताचा अर्ज स्वीकारला होता. मात्र, त्यानंतर जमा करावी लागणारी रक्कम भरली गेली नाही. ही स्पर्धा घेण्याबाबत भारतीय मुष्टियुद्ध संघटनेने सुरू केलेली तयारीही आता वाया जाणार आहे. सर्बियानेही यजमानपदासाठी इच्छुक असल्याचे दाखविले होते, त्यामुळे त्यांना यजमानपद बहाल केले गेले आहे.