नागरिकांचा मूळ गावातील लोकांशी संपर्क वाढला
करोनाचा असाही सकारात्मक परिणाम
पुणे – वडिलांचे आणि माझे पटत नव्हते, बोलत नव्हतो. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या स्थितीमुळे त्यांनी फोन करून बोलवून घेतले. झाले गेले विसरून गेलो, आता मात्र दोघांचे चांगले पटू लागले आहे. तर, दुसऱ्या प्रकरणात जमिनीवरून चुलत भावाशी वाद होता. त्यानेही फोनवरून विचारपूस केली. कितीही इस्टेट, पैसे कमवले तर ते शुन्यच आहे. माणसेच आपली आहेत, असे समजून कुटुंबातील वाद काही प्रमाणात मिटत आहे. करोनाचा हा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
सध्या देशात करोनाचा संसर्ग वाढला आहे. जगभरात एक लाखाहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. याची दहशत सर्वत्र पसरली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन पुकारला आहे. नागरिकांना रस्त्यावरून संचार करण्यास बंदी घातली आहे. करोनाचा विशेषत: शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांना याचा जास्त धोका आहे. उद्योग, कंपन्यातील काम बंद आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आणि कंपनीत काम करणाऱ्यांना घरच्यांनी बोलावून घेतले. ते घरी पोहोचले आहेत. भाऊ-भाऊ, वडिल-मुलगा यांचे पटत नव्हते. मात्र, या संसर्गाच्या भीतीमुळे नात्यातील वाद मिटवून एकत्र आले आहेत.
एकमेकांना समजून घेऊ लागले आहेत. भाऊच नाही तर, भावकीतील लोक संपर्कात आले आहेत. रोजच्या धावपळीच्या जीवनात नातेवाईक जवळ आले असून, दररोज फोन, व्हिडीओ कॉल करून खुशाली जाणून घेत आहेत. काही लोक लॉकडाऊनमुळे गावी पोहोचू शकले नाहीत. ते शहरात असल्याने विशेष करून त्यांची काळजी गावाकडील लोक करत आहेत. गरज असेल तेव्हाच घरातून बाहेर निघा. अन्यथा घरातच राहा. घरातून बाहेर पडला तर काळजी घ्या. सोशल डिस्टेन्स पाळण्याचे आवाहन गावातील लोकांकडून करण्यात येत आहे. शहरात दोन हजारहून अधिक विद्यार्थी अडकले असून त्यांचीही कुटुंबीयांकडून काळजी घेण्यात येत आहे.
गावाकडे शेत आहे. मात्र, शिक्षण, प्रॅक्टिससाठी बाहेरगावीच राहिल्याने गावातील लोकांशी संपर्क नव्हता. मात्र, या कालावधीत संपर्क वाढला आहे. शेतीतून उत्पादन निघत नाही, असे आपण म्हणतो. मात्र, शेती करताना अथवा इतर बाबतीत असलेल्या अडचणी कळत आहेत. त्यांना समजून घेता येत आहे. ते ही आपल्याला समजून घेत आहेत. रक्ताची नाती जोडली जात आहेत.
– ऍड. प्रशांत माने