नवी दिल्ली – पन्नास- साठ वर्षांपूर्वी घरातून बाहेर पडलो होतो. त्यावेळी मनातही आले नव्हते की एक दिवस लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवेल १४० कोटींचा हा देशच माझे कुटुंब होईल असे वाटले नव्हते. मी स्वत:साठी कधी जगलो नाही आणि स्वत:साठी जन्माला आलो नाही. मी तुमच्यासाठी आहे, तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्राण पणाला लावून प्रयत्न करतो आहे असे भावूक उदगार पंतप्रधान नरेंद्र मोदी काढले.
ते भारतीय जनता पार्टीचे दिल्लीतील उमेदवार मनोज तिवारी यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत बोलत होते. २०२४ ची ही निवडणूक भारताला पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये आणण्यासाठी आहे. आपल्या आर्थिक ताकदीचा वापर करून भारताला दिवाळखोर करू पाहणाऱ्या शक्तींपासून भारताला वाचवण्यासाठीची ही निवडणूक आहे.भारतातील युवकांसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठीची ही निवडणूक आहे असे ते म्हणाले.
देशाच्या राजधानीला जगात प्रतिष्ठा मिळो आणि देशाची राजधानी जगाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होवो यासाठी देशाला पुन्हा एकदा मोदी सरकार हवे आहे. जी-२० परिषदेच्या वेळी तुम्ही पाहिले की जगातल्या आघाडीच्या देशांचे नेते राजधानी दिल्लीचे रूप पाहुन चकित झाले होते. आज येथे भारत मंडपम आणि यशोभूमीसारखे अत्याधुनिक सेंटर होत आहेत. नवीन संसद भवन देशाचा गौरव वाढवते आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवान ७० वर्षांपासून नॅशनल वॉर मेमोरियलची मागणी करत होते. दुर्भाग्य असे की जोपर्यंत मोदी आले नाही तोपर्यंत देशातील सरकारांना वॉर मेमोरियल बनवण्याचे महत्व समजले नाही. देशातील नागरिकांचे रक्षण करता करता ३५ हजार पोलीस शहीद झाले.
त्यांच्या स्मारकासाठीही पोलिसांना ७० वर्ष वाट पाहावी लागली. मोदी आले तेंव्हा ते झाले. कॉंग्रेस पक्षावर टीका करताना ते म्हणाले की कॉंग्रेसच्या चार पीढ्यांनी देशावर राज्य केले. मात्र दिल्लीतील चार जागा लढण्याची त्यांच्यात शक्ती नाही. जेथे यांचा १० जनपथचा दरबार आहे, जेथे ते लढू शकताना दिसत आहेत तेथेही हा पक्ष नाही.