जाधववाडी, (वार्ताहर) – जाधववाडी परिसरातील बहुतांश ठिकाणी मद्यपींचे ओपन अड्डे सुरू आहेत. अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यामुळे जाधववाडी परिसरातील शांततेला बाधा पोहोचत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने गस्त वाढवून अवैध कृत्यांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जाधववाडीतील रामायण मैदान-घाट, तळई उद्यान, साई जीवन शाळेसमोरील सभागृह हा सर्व परिसर असुरक्षित बनत चालला आहे. यात विशेषतः बैलगाडा शर्यत घाट परिसर, पाण्याच्या टाकीचा परिसर, तळई उद्यानातील ती बांधलेली रूम तळीरामांचा अड्डा झाला आहे.
सामान्य नागरिकांना व पादचार्यांना या तळीरामांचा नाहक त्रास होत आहे. विशेषतः घाट परिसरात भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले आहे. घाटातून जाणार्या नागरिकांना दमदाटी करणे, मोबाइल काढून घेणे, पैसे काढून घेणे अशी प्रकरणे वारंवार घडत आहेत. याच घाटात वर्षांपूर्वी एका तरुणाची निर्घृण हत्या झाली होती. काही दिवसांपूर्वी तळई उद्यानातून तीन ते चार अल्पवयीन नशाधीन मुलांनी रस्ता अडवला होता. वाहनचालकांना व नागरिकांना याचा त्रास झाला होता.
याच महिन्यात विविध घटना घडल्यामुळे यात एका अल्पवयीन मुलाला काठ्या कोयते घेऊन मारायला वीस पंचवीस मुले आली होती. स्थानिकांनी मध्यस्थी केल्याने मुले निघून गेली. त्या मुलाचे वडिलांनी पोलिसांत तक्रार द्यायला नकार दिला.
निवडणुकीनंतर जाधववाडीतील पंतनगर येथे गोळीबार झाला. या मध्ये इसमाला हाताला गोळी लागली. तो उपचार घेत आहे. ज्यांनी गोळी मारली त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आणखी एक दुसरी घटना घडली.
वीस एक मुलांचा घोळका भांडणाच्या बेतात आला होता स्थानिकांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. याच महिन्यात विविध घटना घडल्याने जाधववाडी सामान्यांसाठी असुरक्षित होत आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनांमध्ये बालगुन्हेगार असल्याने पोलिसांची मोठी डोकेदुःखी वाढली आहे.
पालकांचे होतेय दुर्लक्ष
तीसची चपटी, दहाचा चाखना व दिवसभर फक्त दारू, दारू आणि दारूमध्ये युवक तल्लीन झाले आहेत. घाट परिसरात शर्यती नसताना हा परिसर निर्जन असल्याने बैलगाडा शौकीनांसाठी पत्राशेड मारून बसायला पायर्या केलेल्या आहेत. याच पायर्यांवर अल्पवयीन नशा करीत आहेत. आई-वडील कामावर गेले की बहुतांश अल्पवयीन मुले नशा करत बसत आहेत. त्यांना कोणाचा धाक नसून कुसंगतीमुळे मुले वाइट मार्गाला लागली आहेत.
पोलिसांची वाढली डोकेदुखी
अल्पवयीन गुन्हेगार पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. ना त्यांच्यावर कारवाई करू शकत ना त्यांना समजावून कोणताही फायदा होत. आज समज देऊन सोडले की उद्या पुन्हा तीच मुले दिसतात. यावर एक उपाय म्हणजे या मुलांना बालसुधार गृहात पाठविणे.
यावर निर्णय घेण्यात यावा, अशी ग्रामस्थांतर्फे पोलीस प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र लवकरच आम्ही पोलिसांना देऊ तसेच ग्रामस्थांची मिटिंग घेऊन यावर काही उपाययोजना करता येईल का? याबाबत चर्चा सुरू असअल्याचे युवा नेते विशाल आहेर व अॅड. विशाल जाधव यांनी दिली.
मागील वर्षी महापालिका अधिकार्यांना पत्रव्यवहार केला. अधिकार्यांनी येऊन पाहणी केली आहे. पाण्याच्या टाकीला भिंतीचे कुंपण, गेट व सुरक्षारक्षक देऊ असे नेत्यांप्रमाणे आश्वासन देऊन गेले. परंतु वर्ष उलटून गेले तरी अद्याप काहीही झालेले नाही.
टाकी परिसर व इतर परिसर निर्जन असल्याने दिवसेंदिवस गुन्ह्यांची वाढ होत आहे. सभागृहाला देखील सुरक्षारक्षक देतो पण अद्याप काहीही नाही. ही कोणती कामाची पद्धत आहे. जाधववाडीतील गुन्हेगारी कमी व्हावी म्हणून पोलिसांनी गस्त वाढवावी.- विशाल आहेर, युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट).