संगमनेर – अकोले मतदारसंघासह पठारभागातील पाटपाण्याचे व रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन अकोले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार वैभव पिचड यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील पठारभागाच्या दौऱ्यावर महायुतीचे उमेदवार वैभव पिचड हे बुधवारी आले होते. त्यावेळी बोटा याठिकाणी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शिवसेनेच्या सुरेखाताई गव्हाणे, भाजपचे अशोक इथापे, मिनानाथ पांडे, अरूण इथापे, उद्योजक बबनराव गागरे, शिवसेनेचे उत्तम ढेरंगे उपस्थित होते
पिचड म्हणाले, पाच वर्ष विरोधात असताना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम केले.वेळप्रसंगी रास्ता रोको आंदोलनही केली.
मात्र आपले सरकार नसल्याने मतदारसंघातील रस्त्यांची कामे, पाटपाण्याचे प्रश्न सोडवता आले नाही. तरीही आपण आपल्या आमदार निधीतून थोडा, थोडा निधी देण्याचे काम केले आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून रखडलेले सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे काम आपल्याला करायचे आहे. समोरचे उमेदवार याठिकाणी येवून पिचडांनी पस्तीस वर्ष काय केले असे म्हणतात.
पण खऱ्या अर्थाने माजीमंत्री मधुकर पिचड यांनी पठारभागाच्या विकासासाठी सदैव महत्वाची भूमिका बजावली असून याभागातील सर्व सामान्य शेतकरी आज सुजलाम सफलाम झाला आहे. पाच वर्षात महायुतीच्या सरकारवर कुठलाच भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. आता फिरणारे उमेदवार निवडणूका झाल्या की तोंड सुद्धा दाखवणार नाही, असा आरोपही त्यांनी राष्ट्रवादी उमेदवार डॉ. लहामटे यांच्यावर केला.
शिवाजी तळेकर म्हणाले की, अकलापूर गावच्या विकासासाठी माजीमंत्री मधुकर पिचड यांनी भरभरून निधी दिला असल्याने आज त्यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लागले आहे. अशोक वाघ म्हणाले की, माजी मंत्री मधुकर पिचड व आमदार वैभव पिचड यांनी पठारभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत त्यामुळे सर्व सामान्य जनता आज त्यांच्या पाठीमागे नक्कीच आहे. यावेळी युवा नेते कैलास ढोले, हॉटेल लक्ष्मीचे मालक आमीर शेख, गणेश लेंडे, सुशील आभाळे, रऊफ शेख, तान्हाजी कुरकुटे, सय्यद मोमीण, बबन शेळके, सुधीर पोखरकर, गणेश आभाळे, अरुण कुरकुटे उपस्थित होते.