कामशेत (चेतन वाघमारे) – एकीकडे मावळ लोकसभेसाठी मला भाजपकडून शब्द दिल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. तर दुसरीकडे मावळ लोकसभेसाठी आमचा उमेदवार दिल्यास दीड लाख मतांनी निवडून येईल, असे मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी (दि. ३) सांगितले. यापूर्वी माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या वाढदिवसाला भावी खासदार म्हणून केक कापत मावळ लोकसभेवर आपली दावेदारी सांगितली. आता भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनीही मावळ लोकसभेवर आपला दावा सांगितला आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
लोकसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. येत्या निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. येत्या निवडणुकीत आमचाच विजय होईल, असे दोन्ही बाजूंकडून सांगितले जात आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नसला तरी अनेकजण गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत. तर महायुतीतील शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे प्रमुख दावेदार आहेत.
आपल्याला भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा खासदार बारणे यांनी केला आहे. तर माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या शुभेच्छा फलकांवर भावी खासदार असा उल्लेख असल्याने ते देखील भाजपकडून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जाते.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणीही उमेदवार घोषित केलेला नसला तरी या पक्षाकडून मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडून लोकसभेवर दावा सांगितला आहे. राष्ट्रवादीला उमेदवारी दिल्यास दीड लाख मतांनी आमचा उमेदवार जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
सध्या मावळात भाजपचे ‘फिर एक बार मोदी सरकार’चा नारा दिला आहे. त्या निमित्त पक्षाच्या वतीने गाव चलो अभियानाची सुरुवात झाली आहे. कामशेत येथे झालेल्या कार्यक्रमाच्यावेळी बोलताना विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे म्हणाले की, कोणीही पोकळ वल्गना करून मावळ लोकसभेवर दावा करण्याचे कार्य करू नये. भेगडे याच्या विधानानंतर पुन्हा एकदा मावळमधील महायुतीमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप होणे गरजेचे
महायुतीकडून जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही, तोपर्यंत अशी विधाने येत राहणार आहेत. मात्र सध्या असलेले मतभेद मनाभेदामध्ये परावर्तित होण्याआधी याबाबत वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप होणे गरजेचे आहे, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.