कहलगाव (बिहार) – बिहारमधील भाजप-जेडीयू आघाडी सचिन-सेहवाग या सलामीवीरांप्रमाणे ‘सुपरहिट’ असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. बिहार येथील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सध्या विविध राजकीय पक्षांनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे. अशातच आज राजनाथ सिंह भागलपूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेत सहभागी झाले.
“नितीश कुमार यांच्या काळात बिहारचा सर्वांगीण विकास झाला असा दावा मी करणार नाही. बिहारमध्ये विकास कामं कमी-अधिक प्रमाणात झाली अथवा ती आणखी जास्त व्हायला हवी होती याबाबत चर्चा होऊ शकते. मात्र भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरून कोणीही नितीश कुमार यांच्याकडे बोल दाखवू शकणार नाही.” अशा शब्दांत सिंह यांनी मुख्यमंत्री कुमार यांची प्रशंसा केली.
राष्ट्रीय जनता दलावर जोरदार निशाणा
बिहार विधानसभा निवडणुकांतील प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या राजदवर देखील सिंह यांनी यावेळी जोरदार निशाणा साधला. येथील भोजपुरी या प्रादेशिक भाषेत बोलताना सिंह म्हणाले, ‘कंदिलाला (राजदचे निवडणूक चिन्ह) गळती लागली असून त्यातलं सगळं तेल गाळून गेलं आहे, त्यामुळे कंदील आता चालणार नाही.”
बिहारी सैनिकांच्या शौर्याचा गौरव
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी भारत – चीन सीमेवर घडलेल्या रक्तरंजित झटापटीचा उल्लेख केला. ‘या झटापटीमध्ये बिहार रेजिमेंटच्या सैनिकांनी शौर्य दाखवत भारत मातेचा अभिमान जपला. बिहार रेजिमेंटने दाखवलेल्या शौर्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार’ असंही ते म्हणाले.
“नीतीश कुमारांना रोखण्यासाठीच भाजपकडून चिराग पासवानांना पाठबळ”