पाटना – बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण चांगलंच तापलंय. अशातच आता कॉंग्रेस नेते तारिक अन्वर यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय.बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए उरली नाही. जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पक्षातील वाद बिहारची जनता पाहते. यामागे भाजपचा हात आहे. भाजप चिराग पासवान यांचा वापर करत आहे, असा आरोप अन्वर यांनी केला आहे.
बिहारच्या जनतेला सत्य परिस्थिती माहिती आहे. सत्ताधारी भाजप आणि जनता दल युनायटेड सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे आणि भाजपला ही वस्तूस्थिती मान्य आहे. त्यामुळेच नितीश कुमार यांच्याविरोधात वातावरण निर्मितीसाठी भाजपने चिराग पासवान यांना पुढे केल्याचा आरोप अन्वर यांनी केलाय.
बिहारमध्ये कॉंग्रेससाठी सकारात्मक वातावरण असल्याचा दावा तारिक अन्वर यांनी केला. राहुल गांधी हे बिहार निवडणूक प्रचारात उतरणार आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह अन्य कॉंग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्रीही बिहार निवडणूक प्रचारात उतरणार असल्याची माहिती अन्वर यांनी दिली आहे.
पती-पत्नीच्या सरकारमुळं बिहार आजारी, आम्ही इलाज केला- नितीश कुमार
लालू प्रसाद यादव आणि राबडीदेवी या पती-पत्नीने 15 वर्ष बिहारवर राज्य केलं. त्यावेळी बिहारमध्ये कोणत्याही प्रकारची आरोग्य व्यवस्था नव्हती. बिहार आजारी होतं. मात्र आमच्या काळात आम्ही सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था उभारली.
आम्ही इलाज काय असतो हे जनतेला दाखवून दिलं, अशी टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलीय. बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारात नितीश कुमार यांनी सोमवारी व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी लालू यादव आणि राबडीदेवी यांच्यावर सडकून टीका केली