पुणे – महायुतीच्या जागा वाटपात पुण्यात शिवसेनेला एक जागा न देणे तसेच भाजपमधील अंतर्गत बंडखोरी, तसेच नाराज रिपाइं कार्यकर्त्यांनी दिलेला फटका भाजपला पुण्यात बसला आहे.
एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला शिवाजीनगरमध्ये भाजपला झगडावे लागले. मागीलवेळी लाखावर मताधिक्य असलेल्या कोथरूडमध्ये भाजपला 50 टक्केही मताधिक्य मिळवता आलेले नाही. तर शिवसेनेचे तीन माजी जिल्हा प्रमुख असलेल्या खडकवासलात भाजपला अडीच हजारांवर मताधिक्य मिळवता आले नाही. मात्र, कसब्यात शिवसेनेचा बंडखोर फारसा फरक पाडू शकला नाही.
जागा वाटपापासूनच शिवसेना आणि भाजपमध्ये पुण्यातील जागांवरून धुसफूस सुरू होती. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर ही धुसफूस गांभीर्याने घेण्यात आली नसली, तरी स्थानिक पातळीवर शिवसेनेचे इच्छुक नाराज होते. त्यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र, पुण्यात शिवसेनेला नारळच मिळाला. त्यामुळे बंडखोरांनी “मातोश्री’ गाठली.
यावेळी त्यांना शांत राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यामुळे अनेकांनी भाजपच्या प्रचारात सहभाग घेतला. मात्र, आता निवडणूक निकालानंतर खरंच पुण्यात शिवसेना भाजपसोबत होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हडपसरमध्ये योगेश टिळेकर यांना 2800, तर वडगावशेरीतही सुमारे 4 हजार मतांनी जगदीश मुळीक यांना पराभव पत्करावा लागला आहे. दोन्ही मतदारसंघात शिवसेनेची सर्वाधिक ताकद होती. तर येरवड्यात रिपाइंचीही ताकद आहे, असे असतानाही मुळीक यांचा पराभव झाला. तर, हडपसरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक असतानाही टिळेकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
विजयोत्सवात शिवसैनिक दूरच
शिवसेनेला एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते देखील भाजपच्या यशात सहभागी झाले नसल्याचे चित्र होते. तर भाजप उमेदवारांच्या विजयाचा कल दृष्टिक्षेपात आल्यानंतर रिपाइंच्या काही पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्राला आवर्जून भेट दिली.