मुंबई – भारतीय जनता पक्ष कितीही, काहीही, कोणताही आव आणत असला तरी त्यांच्याकडे स्वतःचे काहीच नाही. त्यामुळे ते बुद्धिभेदाचे राजकारण करत आहेत. आजच्या स्थितीला भाजपचे जवळपास ६५ टक्के खासदार हे काँग्रेसच्या विचारधारेचे आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. तर सोबतच वंचित बहुजन आघाडीचा, महाविकास आघाडीत समावेश होणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पटोले पुढे म्हणाले की, अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीचा विषय हा कोणत्याही परिस्थितीत राजकीय होऊ शकत नाही. त्याचे शंभर टक्के राजकारण करण्याचे प्रयत्न भाजप करीत आहेत. त्यांच्या धोरणात रामाचे मंदिर आहे, मात्र रामराज्य नाही. सध्या तर अक्षरशः रावणराज सुरू आहे. देशातील सरकारी यंत्रणांचा किती दुरुपयोग होऊ शकतो, याचा धडा सगळ्यांना मिळत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देऊन कितीही दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरीही आता विरोधक त्यांना भीक घालणार नाही.
पटोले पुढे बोलताना म्हणाले की, आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार असतील. या आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. अतिशय चांगली सुसूत्रता आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या प्राथमिक फेरीत चांगली चर्चा झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीला देखील समाविष्ट केले जाणार आहे.
अन्य पर्यायांचा सकारात्मक विचार नेत्यांमध्ये असल्याने, अतिशय प्रबळ उमेदवार आणि ताकदीने भाजपला आव्हान दिले जाणार आहे. भाजप महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या तयारीने धास्तावलेला आहे. त्यामुळे त्यांचा सर्व भर अफवा पसरवण्यावर आहे. सध्या त्यांची झोप उडाल्याने रोज बैठका आढावा आणि दौरे करून चुकीची माहिती पसरविण्यावर भर आहे, असा दावा देखील पटोले यांनी केला आहे.