अखिलेश यादव यांच्यावरही टीकास्त्र
रायबरेली – सामान्य जनतेची सेवा हा राजधर्म मानला जातो. मात्र, केंद्रात आणि उत्तर प्रदेशात सत्तेवर असणाऱ्या भाजपला त्याचा संपूर्ण विसर पडला आहे. तो पक्ष फक्त बड्या उद्योगांसाठी कार्यरत आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी रविवारी सोडले.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या प्रचारासाठी येथे झालेल्या सभेत प्रियंका बोलत होत्या. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्यांपासून जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी भाजप धार्मिक भावना भडकावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील काही वर्षांत पाकिस्तानसह अनेक देशांना भेटी दिल्या. मात्र, शेतकरी आंदोलकांच्या भेटीसाठी ते गेले नाहीत.
निवडणुका जवळ आल्यावर केंद्रीय कृषी कायद्यांबद्दल माफी मागण्यासाठी ते पुढे आले, असे त्या म्हणाल्या. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनाही प्रियंका यांनी टीकेचे लक्ष्य केले.
मागील तीन वर्षांपासून मी उत्तर प्रदेशात कार्यरत आहे. त्या काळात अखिलेश यांनी घर सोडलेले मी कधीच पाहिले नाही. आता निवडणूक आल्यावर मत मागण्यासाठी ते बाहेर पडले आहेत, अशी खिल्ली प्रियंका यांनी उडवली.