तेहरान – इराणचे राष्ट्रपती इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. हा घात आहे की अपघात आहे याबाबत जगभरात चर्चा सुरू आहेत. काही देशांना यातून कारस्थानाचा वास येतो आहे तर काही देशांच्या म्हणण्यानुसार खराब हवामानामुळे झालेला हा अपघात आहे. मात्र इराणला या दुर्घटनेबद्दल काय वाटते ते जाणून घेणेही महत्वाचे आहे. आता त्या देशानेही यासंदर्भात आपले म्हणणे मांडले असून त्यातून या दुर्घटनेची इनसाइड स्टोरी समोर आली आहे.
राष्ट्रपती रईसी यांचे चीफ ऑफ स्टाफ गुलाम हुसेन इस्माइली यांनी एका मुलाखतीत सांगितले की रईसींच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण झाले तेंव्हा हवामान अगदी ठिकठाक होते. त्यांच्यासोबत अन्य दोन हेलिकॉप्टरही उडत होती. एका उदघाटनाच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती परत येत होते. जेमतेम ४५ मिनिटे झाली असतील आणि राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरसमोर दाट धुके पसरले. रईसी यांच्या हेलिकॉप्टरच्या पायलटने अन्य दोन हेलिकॉप्टरच्या पायलटना उंची वाढवण्यास सांगितले.
मात्र हे सुरू असताना अचानक राष्ट्रपतींचेच हेलिकॉप्टर गायब झाले.विशेष म्हणजे राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर गायब झाल्याचे बराच वेळ अन्य दोन हेलिकॉप्टर चालकांना समजलेच नाही. एक हेलिकॉप्टर बेपत्ता झाले असल्याचे त्यांना तब्बल ३० मिनिटांनंतर समजले. ही बाब लक्षात आल्यावर त्या दोन पायलटस्नी त्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा मागे वळवले आणि शोध सुरू केला. रेडिओ उपकरणाद्वारे संदेश पाठवला गेला.
राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्यांना त्यात अपयश आले. अखेर त्यांनी त्यांचे हेलिकॉप्टर तांब्याच्या खाणीतच उतरवले. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरवर जो प्रभारी होता त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र पलिकडे कोणा अन्य जणाशीच संपर्क प्रस्थापित झाला आणि हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती त्याने दिली.