कलबुर्गी (कर्नाटक) – भारतीय जनता पक्षाचे देशातील सर्वच राज्यांत नुकसान होताना दिसत आहे, असे असूनही भाजपचे नेते चारशे पारचा नारा तरी कशाच्या आधारावर देत आहेत असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. इंडिया आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता असून सगळीकडून आम्हाला मात्र अनुकुल संकेत मिळत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
आज आपल्या गावी आलेले खर्गे येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की ही निवडणूक जनता आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील निवडणूक आहे कारण लोक आज निराश झाले आहेत, विशेषत: महागाई आणि उच्च बेरोजगारीमुळेते त्रस्त आहेत.
मोदी सरकारने लोकशाही आणि भारतीय संविधानावर मोठा आघात केला आहे, स्वायत्त संस्थांचा गैरवापर करून भाजप प्रशासन चालवत आहे, त्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज आहेत आणि इंडिया पाठिंबा देत आहेत; त्यामुळे आम्हाला चांगली संधी आहे.
भाजपचा चारशेपारचा नारा कसा चुकीचा आहे हे नमूद करताना खर्गे म्हणाले की, कर्नाटकात गेल्यावेळी आम्हाला एक जागा मिळाली होती, पण यावेळी आमची येथील स्थिती त्यापेक्षा कितीतरी अधिक चांगली असेल. ज्या तेलंगणामध्ये काँग्रेस अलीकडेच सत्तेवर आली आहे तेथे २०१९ मध्ये कॉंग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. तेथे काँग्रेसच्या जागांची संख्या वाढेल.
तामिळनाडूत आमचा मित्रपक्ष द्रमुक अबाधित आहे. केरळमध्ये आम्हाला जास्त जागा मिळतील. महाराष्ट्रात आमच्या आघाडीला ५० टक्क्यांहून अधिक जागा मिळतील. राजस्थानात आम्ही गेल्यावेळी शून्य होतो. यावेळी तेथे आम्हाला किमान सात-आठ जागा मिळणार आहेत.
मध्यप्रदेशात आम्ही गेल्यावेळी दोन जागा जिंकल्या होत्या. तिथेही आमचा नंबर वाढेल. छत्तीसगडमध्ये आम्हाला फायदा होत आहे. सगळीकडे अशी स्थिती असताना भाजपवाले कोणत्या आधारावर चारशे पारचा दावा करीत आहेत असा सवाल त्यांनी केला.