पुणे – कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी भाजपकडून सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती केली आहे. मात्र, विरोधीपक्ष स्वर्गीय मुक्ता टिळक यांच्या घरातील उमेदवार असेल तरच विचार केला जाईल असे सांगत आहेत. तर दुसरीकडे भाजपही सावध भूमिका घेत असून उमेदवारी बाबत सर्वच इच्छुकांना तयारी करण्याच्या सूचना पक्षाचे नेते करत आहेत. त्यामुळे, तिकिटाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार यावरून इच्छूक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी शेवटचे पाच दिवस शिल्लक असून आज भाजपचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असून या मतदारसंघात भाजपचे सर्वाधिक नगरसेवकही आहेत. त्यामुळे भाजपकडून स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, धीरज घाटे तसेच मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक इच्छूक आहेत. तर विरोधीपक्षांनी टिळक यांच्या घरातील उमेदवार असेल तरच विचार केला जाईल असे या पूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, त्यानंतरही भाजपकडून अद्याप काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्याच वेळी सर्वच इच्छुकांकडून राज्यातील नेत्यांसह दिल्लीतील नेत्यांकडे तिकिटसाठी लॉबिंग सुरू आहे. त्यामुळे प्रदेश भाजपकडून तीन नावे दिल्लीला कळविली जातील असे सांगणाऱ्या भाजपकडून प्रत्यक्षात पाच जणांची नावे कळविण्यात आली आहेत. त्यात, वरिल चार इच्छूकांसह मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल याचे नावही कळविले आहे. त्याच वेळी भाजपकडून चिंचवड मधून मात्र, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटूंबातच उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले जात आहेत. मात्र, पुण्यात उमेदवारी बाबत मात्र संभ्रमाची स्थिती निर्माण केली जात आहे. त्यामुळे भाजप इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
कुणाल टिळक यांना दिल्लीतून फोन
दरम्यान, भाजपमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच सुरू असतानाच कुणाल टिळक यांना भाजपच्या दिल्लीतील राष्ट्रीय कार्यालयातून बोलत असून तुम्हाला कसबा मतदारसंघासाठी तिकिट जाहीर झाले आहे. तुम्ही ऑनलाईन 70 हजार रूपये पाठवा असा फोन बुधवारी आला. मात्र, हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्याने कुणाल यांनी तत्काळ संबधितांना सुनावले. दरम्यान, याची कोणतीही तक्रार करण्यात आलेली नसली तरी, खरबदारीचा उपाय म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शहराध्यक्ष मुळीक यांना ही बाब टिळक यांच्याकडून कळविण्यात आली असून, या प्रकरणी राष्ट्रीय कार्यालयास माहिती देऊन अशा प्रकारे फसवणुकीचे फोन केले जात असल्याने खबरादारीच्या सूचना देण्याबाबत कळविण्यात आले आहे.