पुणे – राष्ट्राची सुरक्षा कोणाच्या हाती सोपविता येत नाही किंवा इतरांवर अवलंबून राहता येत नाही. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान, संशोधन व विकास यावर भर देऊन आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. संशोधनामध्ये गुंतवणूक करण्यासह आपल्या क्षमता वाढवणे महत्वपूर्ण आहे. ‘आत्मनिर्भर भारत’मुळे देशात संशोधन व विकास याला चालना मिळत असून, लष्करात ही त्यावर भर दिला जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशील लर्निंग, रोबोटिक, अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान आदी क्षेत्रात प्रगती होत आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले.
दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) 29व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनोज पांडे बोलत होते. कल्याणी ग्रुप, भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण बाबा कल्याणी यांना जीवनगौरव पुरस्काराने तर पहिल्या बॅचचे विद्यार्थी समीर मैनी (संस्थापक अध्यक्ष -कोलॅबरेशनरूम.एआय, वाशिंग्टन, अमेरिका) यांना यशस्वी माजी विद्यार्थी युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आपल्या राष्ट्राला महासत्ता बनवण्यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालये यांच्या नेतृत्वाखालील तंत्रज्ञान नवकल्पना अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. ‘एआयटी’ने गेल्या 25 वर्षांमध्ये संरक्षण दलाला उत्तम अधिकारी, चांगले अभियंते, उद्योजक दिले आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि त्यांच्या मातृसंस्थेचा अभिमान बाळगत आहेत. शाश्वत विकास ही काळाची गरज आहे. शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी व्यावहारिक आणि अंमलबजावणीयोग्य उपाय शोधणे आवश्यक आहे. संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भरता महत्त्वपूर्ण आहे, असे पांडे यांनी नमूद केले. प्रास्ताविक ब्रिगेडियर अभय भट यांनी केले. सूत्रसंचालन अभिषेक कुमार मील आणि आशना वेद यांनी केले. मेजर टी. एस. बेन्स यांनी आभार मानले.