नवी दिल्ली – भारतीय जनता पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करते. आम आदमी पक्षासारख्या छोट्या पक्षाला भाजप घाबरतो, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते.
भाजपाशासित केंद्र सरकारने दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य निवडणूक आयोगावर दबाव आणला.
कारण त्यांना आम आदमी पक्षासारख्या छोट्या पक्षाची भिती वाटते, असा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे. 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधीही त्यांनी केवळ त्यांच्या पक्षाने केलेल्या कामावरच अधिक लक्ष केंद्रित केलं होतं. पण पंजाब विधानसभा निवडणुकांमधल्या अभूतपूर्व विजयानंतर केजरीवाल यांनी काल पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. 56 इंच छातीचे दावे खोटे असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.
केजरीवाल म्हणाले, डिसेंबरमध्ये गुजरातमधल्या निवडणुका होणार आहे, त्यावेळी लोक म्हणत आहेत की भाजपा हरणार. जर ते हरण्याची शक्यता असेल तर ते निवडणुकांच्या 10 दिवस आधी निवडणूक आयोगाला पत्र लिहतील आणि सांगतील की आम्ही गुजरात आणि महाराष्ट्र एक करत आहोत, त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जातील.
पुढच्या वेळी जेव्हा लोकसभा निवडणुका हरतोय असं वाटेल तेव्हा ते म्हणतील संसदीय कार्यपद्धती वाईट आहे त्यामुळे आम्ही अध्यक्षीय सरकार आणत आहोत, त्यामुळे निवडणुका पुढे ढकला. काय आहे हा ड्रामा? कसली नौटंकी चालली आहे, असे केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल पुढे म्हणाले, भारत हा लोकशाही देश आहे. इथले लोक ही नौटंकी सहन करणार नाहीत. ते म्हणतात की ते सर्वात मोठा पक्ष आहेत आणि आम्ही छोटा पक्ष आहोत. तरीही तुम्हाला भीती वाटतेय?
जर तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुका लढवा. नुसतं म्हणता 56 इंचाची छाती आहे. निवडणुका होऊद्या, नाहीतर कुर्त्यामध्ये 56 इंचाची छाती नाहीये ते फक्त खोटं आहे. , असंही ते म्हणाले.