पाटणा – बिहारमधील करोनाबाधितांच्या संख्येत आठवडाभरात मोठी वाढ नोंदली गेली. त्याला स्थलांतरितांची घरवापसी कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे इतर राज्यांत अडकून पडलेल्यांचे बिहारमध्ये परतणे त्या राज्यासाठी चिंताजनक ठरत आहे.
लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागांत अडकून पडलेले स्थलांतरित मजूर, विद्यार्थी आणि यात्रेकरूंना त्यांच्या राज्यांमध्ये पाठवण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या मोहिमेंतर्गत अनेक स्थलांतरित आणि विशेषत: मजूर बिहारमध्ये परतत आहेत. मात्र, त्या घरवापसीमुळे बिहारमधील करोनाबाधितांचा आकडा लक्षणीयरित्या वाढला आहे. बिहारमधील करोनाबाधितांची संख्या रविवारी 707 इतकी नोंदली गेली.
त्या संख्येत 4 ते 10 मे या आठवडाभराच्या कालावधीत 200 पेक्षा अधिक भर पडली. त्यामध्ये स्थलातंरितांचे प्रमाण तीन-चतुर्थांश म्हणजे 150 इतके असल्याचे स्पष्ट झाले. बिहारमध्ये सर्वांधिक 41 करोनाबाधित मजुरांची घरवापसी दिल्लीतून झाली. त्याखालोखाल महाराष्ट्रातून आलेल्या 36 आणि गुजरातमधून आलेल्या 33 मजुरांना करोना संसर्ग झाल्याचे आढळले.
लॉकडाऊनमुळे देशाच्या इतर राज्यांत अडकलेले 1 लाखहून अधिक बिहारींनी आतापर्यंत परतल्याचे समजते. त्यामध्ये स्थलांतरित मजुरांची संख्या मोठी आहे.