म्हसवड – गजबलेले आखाडे, तांबड्या मातीच्या मैदान, दंड थोपटणारे पैलवान, रोमहर्षक पकडी, अंगावर शहारा आणणारे समालोचन, हे यात्रांच्या काळात ग्रामीण भागात दिसणारे चित्र लॉकडाऊनमुळे बदलून गेले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात अनेक निर्बंध लादण्यात आले असले तरी या विषाणूचा प्रसार अनेक भागात वाढत आहे. त्यामुळे एरवी तगड्या आव्हानांशी दोन हात करायला पुढे असणाऱ्या, समोरच्या पहिलवानावर दंड थोपटून जाणाऱ्या पैलवानांनी या विषाणूची भीती घेतली आहे. शेकडो मल्लांनी घर गाठले असून अनेक जण पैलवानकी सोडायच्या विचारात आहेत. करोनामुळे यंदा यात्रांमधील कुस्ती मैदानांचा हंगाम वाया गेला आहे.
युवा पिढी जिम, कराटे, योगासने अशा व्यायामातून शरीर कमावते; पण पैलवानाची ऐट, थाट वेगळाच असतो. पूर्वी अनेक गावे पैलवानांसाठी प्रसिद्ध होती, काही आजही आहेत; परंतु नवी पिढी मोबाइल, संगणकावरील धोकादायक गेम्सकडे आकर्षित झाल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. व्यसनांच्या आहारी जाण्याचे प्रमाणही तरुणाईत वाढले आहे. मात्र, ग्रामीण भागात बलदंड शरीर, आत्मविश्वास व प्रतिस्पर्ध्याला चितपट करत धैर्याने जगायला शिकवणारी कुस्ती अजूनही लोकप्रिय आहे; करोनामुळे पैलवान धास्तावले आहेत.
पैलवानांचे अर्थकारण
माण तालुक्यात एक ते दीड हजार पैलवान सराव करत आहेत. साधारणपडे वयाच्या दहाव्या वर्षांपासून अनेक मुले गावोगावच्या तालमीत सरावाला सुरुवात करतात. तालमीत मुक्कामाला असलेल्या मुलांना दूध, अंडी, पालेभाज्यांसा समावेश असलेला पौष्टिक आहार पुरवला जातो. त्यांच्यावर दरमहा तीन ते चार हजार रुपये खर्च येतो. बाहेरगावी राहणाऱ्या पैलवानांचा खर्च 12 ते 15 हजारापर्यंत असतो. गुढीपाडव्यापासून गावोगावी कुस्ती मैदाने सुरू होतात.
या मैदानांमधील बक्षिसांच्या रूपात सर्वसाधारण खेळ करणाऱ्या पैलवानाला हंगामात लाखभर रुपये मिळतात. त्यातून वर्षभरातील खुराकाचा खर्च भागतो. अधिक कुशल पैलवानांना जास्त रक्कम मिळते. बलदंड शरीर व कुस्तीतील प्रावीण्य यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्येही प्राधान्य मिळते; परंतु लॉकडाऊनमुळे यात्रा व कुस्ती मैदाने बंद झाल्याने पैलवानांची आर्थिक रसद तुटली आहे. त्यामुळे अनेकांची पैलवानकी बंद होण्याच्या मार्गावर आहे.
कुस्ती हा सुदृढ समाज, राष्ट्राचा पाया मानला जातो. तालुक्यात हजारो तरुण कुस्तीकडे आकर्षित झाले होते; पण सध्या करोनामुळे या क्षेत्राचे नुकसान झाले आहे. आपल्या देशात हजारो वर्षांची कुस्तीची परंपरा आहे. या कुस्तीला पूर्वी राजाश्रय मिळत होता. सरकारने या क्षेत्राबाबत सकारात्मक विचार करावा.
– प्रभात सिन्हा , अध्यक्ष, माणदेशी चॅम्पियन