नवी दिल्ली : गुजरात एटीएसने अत्यंत मोठी कारवाई केली असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चौघांना अटक करण्यात आल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांची एटीएसकडून कसून चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी आज चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांच्या चौकशीतून महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपी असलेला दहशतवादी अबू बकरकला तब्बल २९ वर्षांनी संयुक्त अरब अमिरातमधून अटक करण्यात यश मिळाले होते. यानंतर आता गुजरात एटीएसने आणखी चार जणांना या बॉम्बस्फोटाप्रकरणी अटक केली आहे.
Gujarat ATS arrests four accused in the 1993 Bombay serial blasts case.
— ANI (@ANI) May 17, 2022
१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण देशाला हादरवले होते. देशातील सर्वात मोठा बॉम्बस्फोट म्हणून मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट ओळखला जातो. यामध्ये एकूण २५७ जणांचा मृत्यू झाला होता. तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते. अबू बकर हा दाऊद इब्राहिमचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. सन १९९७ मध्ये अबू बकर याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.
अबू बकरचे दुबईमधील अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांशी हितसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. सन २०१९ मध्ये बकरला अटकही करण्यात आली होती. मात्र, काही कागदपत्रांच्या अडचणींमुळे तो यूएई अधिकाऱ्यांच्या ताब्यातून सटकण्यात यशस्वी झाला होता. आता त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून, लवकरच भारतात आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.