मुंबई : एमआयएमचे नेते अकबरोद्दीन ओवेसी यांनी कार्यकर्त्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. ओवेसींच्या कृतीचा विरोधी पक्षासह सर्वच प्रमुख पक्षांनी निषेध व्यक्त केला होता. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगजेबचं हे थडगं उद्धवस्त करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी पक्षाची भूमिका मांडताना शिवसेनेला हिंदुत्ववादाच्या मुद्द्याचा संदर्भ देत हे थडगं उद्धवस्त करण्याची मागणी केली आहे. “१८ डिसेंबर २००० रोजी ‘सामना’मध्ये दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब म्हणतात, “संभाजीनगर येथे असलेलं हे औरंगजेबाचं थडगं जमीनदोस्त झालं पाहिजे. तसेच पुन्हा बांधता कामा नये.” शिवसेनेचं हे सरकार आदरणीय बाळासाहेबांचं तरी ऐकणार आहे का? हे थडगं जमीनदोस्त होणार आहे का?” असे प्रश्न मनसेने उपस्थित केले आहे.
तसेच “हे थडगं काय अकबरोद्दीन औवेसींसारख्यांना नतमस्तक होण्यासाठी ठेवलं आहे का?” असा सवाल मनसेने केला आहे. “या शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय आहे? ही निजामाची औलाद इथं येऊन या थडग्यावर नतमस्तक होणार. यासाठी हे थडगं ठेवलं आहे का?,” असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेनेवर निशाणा साधताना अनेक गोष्टींवरुन शिवसेनेने पलटी मारल्याचा टोला लगावत बाळासाहेबांचे हे म्हणणं तरी ऐकणार का अशी विचारणाही मनसेने केली आहे. “आपण संभाजी नगरच्या नामकरणावरुन पलटी मारलेली आहे. बाळासाहेबांनी सांगितलेल्या रस्त्यावरील नमाज, भोंग्यांसंदर्भातील भूमिकेवरुन पलटी मारलेली आहे. किमान बाळासाहेबांचं हे ऐकून या शिवरायांच्या महाराष्ट्रात हे थडगं आपण तोडून टाकणार आहात?, हा आमचा नेमका सवाल आहे. असली नकलीच्या गप्पा मारणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनी आता आपला चेहरा दाखवूनच द्यावा असं आम्ही आव्हान करतो,” असेही काळे यांनी म्हटले आहे.