नगर -भिंगारमध्ये बऱ्याच वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. ती सोडविण्यासाठी नगर महापालिकेने पुढाकार घेतला असून, नगर शहराची अमृत पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर भिंगार शहराला नगरमधून शिल्लक राहिलेले पाणी देण्यात येईल, असे आश्वासन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी भिंगारमधील शिष्टमंडळास दिले.
भिंगार शहराच्या पाणी प्रश्नावर आज नगरच्या महापालिकेत महापौर वाकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यात उपलब्ध पाणी आणि भिंगार शहराला पाणी देता येईल का? या विषयावर अधिकाऱ्यांनी भूमिका मांडली.
महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, उपाध्यक्ष शिवाजी दहिहंडे, छावणी परिषदेच्या नगरसेविका शुभांगी साठे, भिंगार शहराध्यक्ष वसंत राठोड, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर कटोरे, अभियंता परिमल निकम, पाणीपुरवठा विभाग प्रमुख रोहिदास सातपुते आदी यावेळी उपस्थित होते.