जयपूर :– राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा ही आता जगाचे आकर्षण ठरली आहे, कारण संपूर्ण जगातून त्याविषयी उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. ही यात्रा काल राजस्थानात दाखल झाली.
राजस्थानमधील यात्रेच्या पहिल्या दिवशी झालावाड जिल्ह्यातील बाली बोर्डा चौकात गेहलोत पत्रकारांशी बोलत होते. गेहलोत यांनी सांगितले की, जेव्हा हा प्रवास पूर्ण होईल, तेव्हा राहुल गांधी यांच्या समवेत जोडले गेलेले युवक ही त्यांच्यासाठी एक मोठी ऍसेट असेल.
गेहलोत पुढे म्हणाले की, “ही यात्रा केवळ देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. ज्या देशांत लोकशाही आहे त्यांच्यासाठी हा मोठा संदेश आहे. संपूर्ण देश चिंतेत असताना ही यात्रा होत आहे. संपूर्ण देशाच्या भावनेचे प्रतिनिधित्व करत राहुलजींनी ही यात्रा काढण्याचा निर्णय घेतला त्याला सगळीकडेच अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.