मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आज मुंबईतील ‘ग्रॅण्ड हयात’मध्ये बैठक झाली. यावेळी आगामी मुंबई महापालिका आणि इतर महापालिका निवडणुकीतील आघाडीच्या विषयावर ही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. ही बैठक सुमारे दोन तास सुरू होती. त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत उपस्थित होते. तर, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, सुजात आंबडेकर आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी हे उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे आता नवीन राजकीय समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे जागा वाटपाबाबत चर्चा केली असल्याची माहितीही समोर येतेय. आगामी काळात प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजीदेखील उद्धव ठाकरे यांना घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने देखील या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.