मुंबई :– महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या संबंधात समन्वय साधण्यासाठी नेमलेल्या मंत्र्यांनी कर्नाटकातील वादग्रस्त भागाला भेट द्यायची की नाही याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आधी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्राचे दोन मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे सहा डिसेंबरला बेळगावला भेट देणार होते. परंतु त्यातील कायदेशीर गुंतागुंत टाळण्याची गरजही फडणवीस यांनी व्यक्त केली.
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, यापूर्वी वादग्रस्त भागाला भेट देण्याची घोषणा केलेल्या या दोन्ही मंत्र्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्थानिकांनी आमंत्रित केले होते. वादग्रस्त भागात अशा भेटीची व्यवस्था करून कोणतीही कायदेशीर गुंतागुंत टाळण्यात यावी असे आमचे मत आहे. मात्र, मंत्र्यांच्या दौऱ्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.
आपण स्वतंत्र देश आहोत म्हणून कोणीही एखाद्या ठिकाणी जाण्यास मनाई करू नये. तथापि, विवादित क्षेत्राशी संबंधित प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे आणि आम्ही या प्रकरणातील आणखी गुंतागुंत टाळू इच्छितो. मंत्र्यांनी ठरवले तर वादग्रस्त भागात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्री बोम्माई यांनी महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांना बेळगावला न पाठवण्याची सुचना केली होती. कारण त्यांच्या भेटीमुळे सीमावर्ती जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते असा सूचक इशारा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिला होता.