भारत आणि बांगलादेश यांच्यात बुधवारी ऍडिलेड येथील क्रिकेट मैदानावर झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यानंतर एका पाकिस्तानी पत्रकाराने आयसीसी ( ICC ) भारतीय संघाची बाजू घेत असल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आयसीसी ( ICC ) भारतीय संघाला मदत करता असल्याचे समर्थन केले होते. यानंतर आता बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी शाहीद आफ्रिदीच्या त्याच वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
रिकी पाँटिंगने भारतीय संघाला डिवचले; यावर अश्विनने दिले जबरदस्त प्रत्युत्तर, म्हणाला…
एएनआयच्या माहितीनुसार, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी आफ्रिदीने केलेल्या आरोपांवर टीका करताना म्हटले आहे की, “आयसीसीच्या कार्यक्रमांमध्ये कोणत्याही संघाकडे विशेष लक्ष दिले जात नाही. भारताला पहिल्यापासूनच क्रिकेटचे पॉवर हाऊस म्हटले जाते. मला वाटत नाही की आयसीसी कोणत्या एका ठराविक संघाची बाजू घेते. आयसीसीद्वारे सर्वांना समानच वागणूक दिली जाते. कोणत्याही संघामध्ये भेदभाव केला जात नाही.”
पाकिस्तानी चॅनल समा टीव्हीवरील चर्चेदरम्यान एका पत्रकाराने म्हटले होते की, “शाकिब अल हसनही मैदानावरही काहीतरी म्हणत होता आणि तो स्क्रीनवरही दाखवण्यात आला होता. तुम्ही पाहिले असेलच की मैदान पावसामुळे ओले होते. परंतु मला वाटते की आयसीसी भारताला कसेही सेमीफायनलमध्ये नेण्याचा प्रयत्न करत आहे.”
पाकिस्तानी पत्रकाराच्या याच प्रश्नावर उत्तर देताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, ” सामन्यात काय झाले ते मला माहीत आहे. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला होता. त्यानंतर पाऊस होऊनही खेळ पुन्हा सुरू करण्यात आला. कारण सामना भारत खेळत आहे, आणि त्यामुळे आयसीसीवर दबाव आहे, अशी अनेक कारणे असून हे अगदी स्पष्ट आहे. आफ्रिदीच्या या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली आहे.