ICC mandates stop-clock rule – आयसीसीने मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आता षटकांच्या मधे स्टॉप क्लॉक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीची वर्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली त्यात पुरूष टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे नियम आणि २०२६ च्या पात्रता फेरीची प्रक्रिया देखील या बैठकीत जाहीर करण्यात आली.
जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपासून आयसीसी स्टॉप – क्लॉक नियम लागू करणार आहे. हा नियम केवळ एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी असेल. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आयसीसीने स्टॉप क्लॉक नियमाची चाचणी केली होती. त्यांनी पुरूषांच्या काही मर्यादित षटकांच्या सामन्यात याचा प्रयोग केला होता. ही चाचणी एप्रिल २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे. त्याचा अभ्यास झाल्यानंतर आता हा नियम पूर्णपणे अंमलात आणला जाणार आहे. या नियमामुळे एकदिवसीय सामन्याची जवळपास २० मिनिटे वाचतात. आता हा नियम पूर्ण सदस्य असलेल्या संघांमधील एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांदरम्यान अंमलात आणला जाणार आहे. हा नियम १ जून २०२४ पासून लागू होणार आहे.
आयसीसीने वेस्ट इंडीज आणि अमेरिका येथे होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक २०२४ मध्ये उपांत्य लढती व अंतिम लढत या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवल्याचे देखील सांगितले. तसेच विश्वकरंडकाच्या गट साखळीत आणि सुपर ८ फेरीतील सामन्याचा निकाल लावण्यासाठी दुसऱ्या डावात किमान ५ षटके होणे गरजेचे आहे. तर बाद फेरीतील सामन्यासाठी हा दुसऱ्या डावात किमान १० षटकांचा खेळ होणे गरजेचे असणार आहे. आयसीसीने २०२६ टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीची रूपरेषा जाहीर केली. २० संघामध्ये होणारी ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका येथे होणार आहे. २०२६ च्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी १२ संघ थेट प्रवेश करतील. यातील २०२४ च्या विश्वकरंडकातील पहिले ८ संघ आणि क्रमवारीनूसार इतर आठ संघ निवडले जातील.
काय आहे नियम?
स्टॉप क्लॉक नियमानुसार मर्यादित षटकांच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आधीचे षटक संपल्यानंतर नवीन षटक हे ६० सेकंदाच्या आत सुरू करावे लागणार आहे. सामन्यादरम्यान इलेक्ट्रॉनिक घड्याळ हे शुन्यापासून ६० सेकंदापर्यंत वेळ मोजेल. हे घड्याळ ग्राऊंडवर डिस्प्ले केले जाईल. हे घड्याळ सुरू करण्याचे काम हे तिसऱ्या पंचाचे असेल. जर क्षेत्ररक्षण करणारा संघ नवे षटक ६० सेकंदात सुरू करू शकला नाही तर त्या संघाला दोन वेळा वॉर्निंग देण्यात येईल. जर तरी देखील नियमाचे उल्लंघन झाले तर दंड म्हणून प्रतिस्पर्धी संघाला ५ धावा दिल्या जातील.
असे आहेत अपवाद
– ज्यावेळी नवीन फलंदाज मैदानावर येत असेल त्यावेळी हा नियम लागू असणार नाही
– जर मैदानावर खेळाडूवर उपचार सुरू असतील तर हा नियम लागू होणार नाही
– जर काही अपरिहार्य कारणामुळे षटक सुरू करण्यास उशीर होत असेल तर हा नियम लागू होणार नाही