ICC Champions Trophy 2025 :- जगभरात होत असलेल्या विविध टी-२० लीगच्या संघ मालकांनी तसेच प्रमुख आयोजकांनी २०२५ साली पाकिस्तानच्या यजमानपदात होत असलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये टी-२० लीगचे आयोजन जगभरात केले जाते. तसेच याच कालावधीत भारतात आयपीएल स्पर्धा होते तर याच कालावधीत आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा का आयोजित करत आहे, असा सवालही यांनी केला आहे.
चॅम्पियन्स स्पर्धा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आयोजित केली जाणार आहे. याच दरम्यान अन्य चार देशांमध्ये टी-२० लीग देखील होतात. यापूर्वी बीसीसीआयनेही आपला संघ पाकिस्तानात पाठवण्यास विरोध केला होता. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारचा क्रिकेट सामना खेळण्यासाठी जाणार नसल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
२०२५ साली चॅम्पियन्स स्पर्धा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. ८ संघांमधील १५ सामन्यांची ही स्पर्धा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. त्याचवेळी अमिराती, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका या देशांत टी-२० लीगही होणार आहे. त्यामुळेच सर्व सहभागी देशांना आपल्या प्रमुख खेळाडूंना चॅम्पियन्स स्पर्धेत खेळवणे कठीण होणार आहे. कारण या लीगशी या खेळाडूंचा करार झालेला असतो. तसेच याच कालावधीत पाकिस्तानमध्येही पाकिस्तान सुपर लीग होणार आहे. त्यामुळेच आयसीसीने या स्पर्धेचे वेळापत्रक बदलावे अशी मागणी आता पुढे केली जात आहे.
BCCI : ‘अफगाणिस्तान’नंतर आता नेपाळच्या मदतीसाठी पुढे सरसावली बीसीसीआय, घेतला ‘हा’ मोठा निर्णय…
भारताने नकार दिल्यास…
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडक आयोजित करण्यात पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न आहे तो भारतीय संघाच्या सहभागाचा. बीसीसीआयने कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यासाठी आपला संघ पाकिस्तानला पाठवण्याची तयारी दर्शवलेली नाही. हा निर्णय भारत सरकारच घेइल असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे या स्पर्धेचे सामने पाकिस्तानमध्ये झाले तर भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होणार नाही. जर सामने अन्यत्र देशांत हलवले गेले तरच भारतीय संघ सहभागी होणार आहे.
आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून
आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या १७ व्या मोसमाची सुरुवात येत्या २२ मार्चपासून होईल, अशी घोषणा लीगचे अध्यक्ष अरुण धुमळ यांनी केली आहे. यावेळी १० संघांसह जगातील सर्वात मोठी लीग पुढील महिन्यात सुरू होणार आहे. यावेळी देशात लोकसभा निवडणुकाही होणार आहेत. हे लक्षात घेऊन ही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान आयपीएलचा मोसम भारतातच खेळला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी २००९ आणि २०१४ साली लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचे परदेशात आयोजन करण्यात आले होते. परंतु २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने भारतात आयपीएलच्या १२ व्या मोसमाचे यशस्वी आयोजन केले होते. हे लक्षात घेऊन यावेळीही आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने १७ वा मोसमही भारतातच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आयपीएलला या लीगचे वेळापत्रक सरकारच्या सहकार्याने बनवावे लागणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक तयार करण्याचे काम सध्या सुरु असून लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यावर हे वेळापत्रक घोषित केले जाणार आहे.
जर भारतीय संघ आयसीसीच्याच नव्हे तर अन्य कोणत्याही द्विपक्षीय मालिकेत खेळला नाही तर आयोजकांना प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होते त्यामुळेच आयसीसी या मागणीचा फेरविचार करेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. २०२३ साली आशिया करंडक स्पर्धेच सर्वाधिक सामने ते देखील भारताचेच जास्त सामने श्रीलंकेत आयोजित केले गेले. भारताने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले.