मुंबई – राज्यात मध्यावती निवडणुका कधीही लागू शकतात असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आज दादर येथील शिवसेना भवनात शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांची बैठक झाली. यावेळी ठाकरे यांनी मध्यावती निवडणुका कधीही लागू शकतात. तयारीला लागा असे आदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहे. दरम्यान ठाकरे यांच्या या विधानावरून आता राजकीर वर्तुळात उलट-सुलट चर्चांणा उधाण आले आहे. तर आमदार फुटू नयेत म्हणून ठाकरेंनी असे वक्तव्य केल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हंटले आहे.
बैठकीत संपर्कप्रमुखांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, राज्यात राजकीय परिस्थिती अस्थिर झालेली आहे. पंतप्रधानही मोठमोठ्या घोषणा करत आहेत. राज्यात कधीही मध्यावती निवडणुका होण्याची शक्यता आहे. आपल्याला तयारीला लागायचे आहे. प्रत्येक घराघरात पोहोचायचे आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना राज्यात केलेली कामे कार्यकर्त्यांमार्फत घरोघरी पोहोचवायची आहे. अशा सुचना ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहे.
दरम्यान, ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आमदार फुटू नयेत म्हणून ठाकरे यांनी असे वक्तव्य केल्याची प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. तर ठाकरेंकडून पक्षाचा आढावा घेण्याचे काम सुरु आहे. जनतेमध्ये काम करणारे नेते आता त्यांच्यासोबत राहिलेले नाहीत हे त्यांच्या लक्षात आले आहे त्यामुळे राहिलेले नेतेही जाण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे त्यांना पक्षात जोडून ठेवण्यासाठी त्यांनी असे वक्तव्य केल्याची प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या गटातील अनेक आमदार आजही आमच्या संपर्कात असल्याचे मस्के यांनी म्हंटले आहे.