ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने भारतीय संघाच्या टी-२० विश्वचषकातील कामगिरीवर मोठी प्रतिक्रिया दिली होती. भारतीय संघाने स्पर्धेत अद्याप सर्वोत्तम क्रिकेट खेळलेले नाही, असे पाँटिंगने म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता रविचंद्रन अश्विनने आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघाने आपला सर्वोत्तम खेळ केला नसता तर एवढा पराभवाच्या जवळचा सामना जिंकला नसता, असे अश्विनने म्हटले आहे.
रिकी पॉन्टिंगने भारतीय संघाबाबत विराट कोहलीचे खूप कौतुक केले होते. त्यावेळी पॉंटिंगने म्हटले होते की, जर भारताला टी-२० विश्वचषक जिंकायचा असेल तर विराट कोहलीला अधिक चांगला खेळ दाखवावा लागेल. त्याचबरोबर भारतीय संघाने अद्याप आपला सर्वोत्तम खेळ केलेला नाही पण विराट कोहली नक्कीच चांगला खेळला आहे. भारताला ही स्पर्धा जिंकायची असेल तर विराट कोहलीला अशाच धावा कराव्या लागतील, असेही पॉन्टिंग म्हणाला.
यानंतर आर. अश्विनला पत्रकार परिषदेत पाँटिंगच्या भारतीय संघाबद्दलच्या वक्तव्याबाबत विचारले असता, त्याने असे काही नसल्याचे सांगितले. अश्विन म्हणाला की, “भारतीय संघ आपले सर्वोत्तम क्रिकेट खेळला नाही किंवा संघ आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसत नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. सामान्याच्या दिवशी तुम्ही कशी कामगिरी करता आणि एखाद्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली असेल, तर तुम्ही त्याचा प्रतिकार कसा करता यावर अवलंबून असते. संघ चांगला खेळला नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही. अगदी छोट्या गोष्टींमुळेही टी-२० क्रिकेटच्या सामन्यात मोठा फरक पडू शकतो.
अश्विन पुढे म्हणाला की, “आम्ही इथपर्यंत सहज पोहोचलो नाही. बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्धचा आमचा सामना जिंकणे कठीण होता. या सामन्यांमध्ये आम्हाला शेवटपर्यंत लढावे लागले. जे लोक या सामन्याबद्दल तज्ञ म्हणून आपले मत व्यक्त करत आहेत ते अजूनही शिकत आहेत की हा खेळ छोट्या छोट्या गोंष्टींवरही अवलंबून आहे.