पुणे – कर्नाटकमधील ऊस परराज्यात नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचा सीमावर्ती भागातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला फटका बसण्याची शक्यता आहे.
महापुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमधील ऊस उत्पादनात यंदा घट होणार आहे. आता कर्नाटकातून येणाऱ्या ऊसावरही बंधने आल्यामुळे साखरपट्ट्यालाच ऊसाकरिता झुंजावे लागणार असल्याची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखाने कर्नाटकातील ऊसावर अवलंबून आहेत. यंदा महापुरामुळे उसाचे 40 टक्के पीक खराब झाल्याने कर्नाटकातील उसावर त्यांची मदार आहे. मात्र, कर्नाटक शासनाच्या निर्णयामुळे अनेक साखर कारखान्यांचे ऊस उपलब्धतेचे समीकरण बिघडणार आहे. कर्नाटकचे मंत्री सी. टी. रवी आणि कर्नाटकातील साखर कारखानदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
गेल्यावर्षी कर्नाटकात पडलेल्या दुष्काळामुळे ऊस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यात आणखी भर म्हणून महापुरामुळे नदीकाठावरील 50 टक्के ऊस खराब झाला आहे. या सर्वच कारखान्यांचा हंगाम दोन महिने तरी चालेल की नाही याविषयी शंका आहे.