मुंबई – गेल्या महिन्यापासून चातकाप्रमाणे वाट पाहणारा बळीराजा उत्तरा नक्षत्रातील पावसाने (rain) अखेर सुखावला आहे. मागील 24 तासांत राज्यातील (maharashtra) अनेक भागात मुसळधार पाऊस (rain) झाला आहे.
कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार झाला आहे. खरीप हुकला पण रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
येवला, मनमाड, मालेगाव, नांदगाव, चांदवडसह ग्रामीण भागात पावसाची दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे, गणेशोत्सव काळात बळीराजा सुखावला आहे.
परभणी जिल्ह्यातील मनवत भागात मागील तासात 130 मिमी पाऊस, अंबेजोगाई, मोमिनाबाद परिसरात 90 मिमी, अंबड आणि बदनापूर भागात 70 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
नगर जिल्ह्यात देखील मागील 24 तासात धुवांधार पाऊस झाला आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यात देखील मागील 24 तासात अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
नागपूरात फडणवीसांची पाहणी…
उपमुख्यमंत्री आणि नागपुरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अंबाझरी तलाव परिसरातून पूरग्रस्त इमारतींमध्ये पाहणी करताना काही रहिवाशांनी प्रशासनाबाबत त्यांच्याकडे नाराजी देखील व्यक्त केली.
नाग नदी परिसरात ढगफूटीसदृश पाऊस झाल्याने नागपुरात पूरस्थिती निर्माण झाली. अंबाझरी तलावही ओव्हर फ्लो झाल्याने शहरांत पाणी शिरले, त्यात आतापर्यंत तीघांचा मृत्यू तर 10 हजारांहून अधिक घरे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. “नागरिकांना जास्तीत जास्त मदत त्यांना केली जाईल.
नागपुरात झालेला पाऊस हा नेहमीपेक्षा अधिक पट जास्त होता. प्रत्येक आपत्ती काहीतरी शिकवून जातो त्यामुळे आता तशी व्यवस्था केली जाईल. शहरात नुकसान झालेल्यांना योग्य ती मदत केली जाईल,’ असे यावेळी बोलताना फडणवीस यांनी म्हटले आहे.
शहरात चौथ्या दिवशीही सरी…
पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. मात्र, हा जोर काहीसा कमी असल्याने पंधरा ते वीस मिनिटे तो बरसला. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत शहरात 7 मिमी पावसाची नोंद झाली. तर मगरपट्टा परिसरात 8 मिमी पाऊस झाला.
दरम्यान, पावसामुळे बदललेल्या वातावरणात हवेत गारवा पसरला आहे. गणरायाच्या आगमनानंतर पुणे शहरासह राज्यात सर्वदूर पावसाला चांगली सुरवात झाली.
त्यामुळे, पुण्याचा गणेशोत्सव पहायला येणाऱ्या नागरिकांची धांदल उडत आहे. रविवारीही जोरदार पावसाची शक्यता असताना, दिवसभर ढगाळ वातावरण होते.
दुपारी शहरासह उपनगरात काळे ढग दाटून आले आणि चारच्या सुमारास पावसाला जोरदार सुरवात झाली. काहीवेळ पडलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले.
तर सुट्टीचा दिवस आणि पावसही थांबलेला त्यामुळे भाविकांनी गणपती बाप्पाचे दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी शहरात गर्दी केली. त्यामुळे कोंडीत आणखीन भर पडली.