मुंबई : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी नेहमी चर्चेत राहणारे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. कारण राणा दाम्पत्याने यांनी अलीकडेच आपल्या मतदारसंघातील गरीब नागरिकांना किराणा वाटप केल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक लाख लोकांना किराणा वाटप करणार असल्याचेही सांगितले त्यावरूनही जोरदार टीका केली आहे.
बच्चू कडू अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. मात्र, आपण या अधिकाराचे पतन करत पुन्हा किराणा देणाऱ्याला निवडून देतो, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. यावेळी बच्चू कडू म्हणाले, काही ठिकाणी मतं मिळवायची असतील तर राजकीय नेत्याला रक्ताची आहुती द्यावी लागते. मी रक्तदान करून निवडणुकीचा अर्ज भरला होता. राजकीय मंडळींनी दान करण्याची प्रवृत्ती ठेवणं महत्त्वाचं आहे. नाहीतर येथे आधी खिशे कापणारे मग किराणा वाटणारे महाठग, महाअवलादी कमी आहेत का? असा सवालही बच्चू कडूंनी विचारला आहे. त्यांनी नाव न घेता राणा दाम्पत्याला खोचक टोला लगावला आहे.
“गोरगरीबांचे खिशे कापायचे, त्यांच्या खिशात हात घालायचा. लोकशाहीचं पतन करायचं. राजकारणाची ऐशी की तैशी करायची”,असे नेते आपल्यात कमी नाहीत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला, त्या अधिकाराचं पतन करत आम्ही पुन्हा किराण्यावर निवडून येतो, असे सांगणाऱ्या महाठगाला सुद्धा आपण पाहतोय, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. त्यांनी अप्रत्यक्ष राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.