मुंबई – गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष अनेक पेच प्रसंगांचा सामना करतोय.आधी पक्षात उभी फूट पडली त्याचा परिणाम म्हणून सरकार गेलं नंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षासह चिन्हावर दावा केला त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने गोठवलं. ज्या निवडणुकीची सर्वांना उत्सुकता होती त्या अंधेरी पोटनिवडणुकीत निवडणुकीत ठाकरेंच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधातील भाजप उमेदवाराने माघार घेतली.अशा या सर्व घटनाक्रमामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तरी ठाकरे गटाला नाव आणि मूळ चिन्ह मिळणार का ? अशी चर्चा सुरु असताना वरिष्ठ वकील उज्वल निकम यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
दोन्ही गटांना देण्यात आलेली चिन्हं जरी अंधेरी पोटनिवडणुकीपुरती असली तरी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही हीच चिन्हं वापरावी लागू शकतात अशी शक्यता उज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना निकम यांनी शिवसेनेच्या मूळ चिन्हाबाबत भाष्य केलं. असं झाल्यास हा ठाकरे गटासाठी मोठा फटका मानला जाईल असही ते यावेळी म्हणाले.
“निवडणूक आयोगाने सध्या दोन्हही गटांना नवीन चिन्ह आणि नाव दिल आहे. हे अंधेरी पोटनिवडणुकीपुरत असलं तरी जर महानगरपालिकेची निवडणूक लागली तर आयोगाला याबाबत निर्णय द्यावा लागेल की आहे ते चिन्ह ठेवायचं कि धनुष्यबाण द्यायचा. अर्थात निवडणूक आयोगाचा हा निर्णय सुरु असणाऱ्या सुनावणीवर अवलंबून आहे. ही सुनावणी जर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आगोदर संपली तर तो वाद तिथे मिटू शकतो. मात्र ही सुनावणी प्रलंबित राहिली तर माझ्यामते ही चिन्हं त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वापरावी लागतील असं आज तरी दिसत आहे,” असं स्पष्ट मत यावेळी उज्वल निकम यांनी व्यक्त केलं.