मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची सहकुटुंब भेट घेतली. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, त्यांच्या या भेटीवर संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या. त्यातच आज शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी याच भेटीवरून राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर टोलेबाजी करत सदू आणि मधू भेटले असतील असे म्हटले आहे.
आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांना राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीविषयी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी,”भेट झाली तर मग मी काय बोलणार? बालभारतीत धडा होता आम्हाला सदू आणि मधू भेटल्याचा तसे भेटले असतील. ते जुने मित्र असतील किंवा नव्याने प्रेम उफाळून आलं असेल. मालेगावात जी विराट सभा झाली त्यानंतर त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील एकमेकांचे अश्रू पुसायला भेटले असतील. आम्ही काय करणार? आम्ही आमचं काम करतोय असे म्हणत त्यांनी टोला लगावला.
दरम्यान, यावेळी त्यांनी राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर पक्षाची आणि आपली भूमिका स्पष्ट केली. याविषयी बोलताना त्यांनी “महाराष्ट्रात वीर सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्यांना माफीवीर म्हणणं त्यांच्या इतर कुठल्याही प्रकारे अपमान करणं हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. महाराष्ट्र सहन करणार नाही. मी या विषयावर दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिंदे गटावर टीका करताना संजय राऊत यांनी,”काही पक्ष आमच्यावर टीका करतात ते पक्ष आहेत का? ते पिसं गेलेले कावळे आहेत. त्यांनी मॅच फिक्सिंगसारखे आरोप आमच्यावर करू नयेत. मालेगावात जी सभा झाली त्यामुळे महाराष्ट्राला शिवसेना कुणाची हे समजलं आहे. बाकी स्वतःला पक्ष म्हणणवाऱ्यांची जी काही मॅच फिक्सिंग राज्यात सुरू आहे ती सुरू राहुदेत आम्ही त्यावर बोलणार नाही. मालेगावात जी सभा झाली त्यातून हे समजलं आहे की येत्या काळात नार्को टेस्ट कुणाची होणार आहे,” असे म्हणत पुन्हा एकदा खरी शिवसेना आमचीच असल्याचा उल्लेख केला.