मुंबई – काल मालेगाव येथे झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यापासून ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील समाचार उद्धव ठाकरेंनी घेतला. भाजपने जाहीर करावे मिंधेंना नेते म्हणून निवडणुक लढणार का? तुमचे 52 काय 152 कुळे खाली उतरली तरी ठाकरेंपासून शिवसेना वेगळी करणे शक्य नाही.असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला आता यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“माझ्या कुळाचा उल्लेख करून त्यांना आनंद मिळत असेल. यावरून दिसतेय ते किती घाबरलेले आहेत. आज जे आहेत उरले सुरलेले, त्यातील चारच लोक जातील” असा पलटवार बावनकुळेंनी यावेळी केला आहे. इंदापूरात माध्यमांशी बोलताना बावनकुळेंनी ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले.
मिंधे गटाला केवळ ४८ जागा देणार आहेत असं ऐकलं.. निदान तुमच्या आडनावाएवढ्या तरी जागा त्यांना द्या असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना लगावला होता. त्यावर बावनकुळे म्हणतात,”जागा वाटपाची कोणतीही चर्चा झाली नाही. भाजपा-शिवसेना युती मिळून २८८ जागा आम्ही लढणार आहोत. ४८ लोकसभा आणि २०० हून अधिक विधानसभेच्या जागा आम्हाला जिंकायच्या आहेत”
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे नेमकं सभेदरम्यान
तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील म्हणाले ‘हे सत्तांतर आम्ही हृदयावर दगड ठेवून हे स्वीकारले आहे’. आताचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणतात आम्ही मिंधे गटाला 48 जागाच देणार. निदान तुमच्या नावएवढ्या जागा तरी त्यांना द्या.तुमच्यासाठी जिवंत माणसांचं त्याग करून तुमच्यासोबत आले, त्यांना 48 जागांमध्ये आटोपणार आहात का? असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
भाजपने जाहीर करावे मिंधेंना नेते म्हणून निवडणुक लढणार का? तुमचे 52 काय 152 कुळे खाली उतरली तरी ठाकरेंपासून शिवसेना वेगळी करणे शक्य नाही. तुम्ही मोदींच्या नावाने निवडणुक लढवा मी माझ्या वडिलांच्या नावाने लढतो. तुम्ही मोदींच्या नावाने मते मागा, मी माझ्या वडिलांच्या नावाने मते मागतो, बघूया जनता कोणाच्या बाजूने आहे पण निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा असं आव्हान यावेळी ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिल होत.