मुंबई – भारतीय महिला संघाने वानखेडे स्टेडीयमवर झालेल्या कसोटी सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचा ८ विकेटने दणदणीत पराभव करत पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. भारतीय महिला ब्रिगेडचा हा ऑस्ट्रेलियावरील पहिलाच विजय आहे. यापूर्वी कसोटी इतिहासात भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाला पराभूत करता आले नव्हते. तसेच अगदी काही दिवसांपूर्वी इंग्लंडला पराभूत करत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली होती.
सामन्याचा नायक स्नेह राणाने दुसऱ्या डावात ४ आणि पहिल्या डावात ३ बळी घेतले. त्यामुळे तिला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. तत्पूर्वी, स्नेह राणासह हरमनप्रीत कौर आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्यामुळे भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २६१ धावांत गुंडाळले. यानंतर विजयासाठी मिळालेले ७५ धावांचे माफक लक्ष्य भारताने १८.४ षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले. स्मृती मानधना ३८ धावांवर नाबाद राहिली, तर जेमिमाह रॉड्रिग्स १२ धावांवर नाबाद परतली.
राणाने २२ षटकात ६३ धावा देत ४ बळी घेतले, तर गायकवाडने ४२ धावा देत २ बळी घेतले.
𝙒𝙄𝙉𝙉𝙀𝙍𝙎! 🏆#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/BhE0fNDSIb
— BCCI Women (@BCCIWomen) December 24, 2023
यापूर्वी, दोन्ही देशांच्या महिला संघांमध्ये खेळल्या गेलेल्या १० कसोटी सामन्यांमध्ये भारताला चार वेळा पराभूत व्हावे लागलेले आहे. तर ६ सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे तब्बल चार दशकांनंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारताने संस्मरणीय विजयाची नोंद केली आहे.
पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात सर्वबाद २१९ धावांवर आटोपला होता, तर यजमान संघाने ४०६ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती.
६४ वर्षांनंतर अद्भुत योगायोग….
महिला संघाच्या आजच्या विजयानंतर एक अत्यंत अद्भुत योगायोग पहायला मिळाला. आजच्याच दिवशी ६४ वर्षांपूर्वी म्हणजेच २४ डिसेंबर १९५९ रोजी गुलाबराय रामचंद यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाचा कसोटी फॉर्मेटमध्ये प्रथमच ११९ धावांनी पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्या सामन्यात जसुभाई पटेल यांनी सामन्यात एकूण १४ बळी घेताना भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय, नारी कॉन्ट्रॅक्टरने संघाच्या दुसऱ्या डावात ७४ धावा केल्या होत्या, त्यामुळे चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाला २२५ धावांचे लक्ष्य देण्यात भारताला यश आले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कांगारू संघाला केवळ १०५ धावांवर रोखले.
फोटो काढताना माझ्याकडून चूक झाली…
ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली आपल्या संघाचा पराभव विसरून टीम इंडियाच्या विजयावर आनंदी दिसत होती. दरम्यान, एलिसा स्वत: हातात कॅमेरा घेऊन विजयी सेलिब्रेशन करताना भारतीय संघाचे फोटो काढतानाही दिसली. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा तिला फोटो काढण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने हा माझा कॅमेरा नसल्याचे सांगितले. मी कॅमेरामनकडून कॅमेरा घेऊन फोटो काढला पण यादरम्यान माझ्याकडून चूक झाली. कारण मी फक्त अर्ध्या भारतीय संघाचा फोटो काढू शकले. त्यामुळे त्यांनी तो फोटो वापरू नये, असेही ती म्हणाली.
कसोटीत महिला ब्रिगेड
भारतीय महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत ४० कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी टीम इंडियाने केवळ ७ सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, केवळ ६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि २७ सामने अनिर्णित राहिले आहेत. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियापूर्वी इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला कसोटीत पराभूत केले आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक तीन कसोटी सामने जिंकले आहेत.
भारतीय महिलांची कामगिरी
१. इंग्लंडविरुद्ध ३ विजय
२. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ विजय
३. वेस्ट इंडिजविरुद्ध १ विजय
४. ऑस्ट्रेलियाविरुद्ध १ विजय
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : ७७.४ षटकांत सर्वबाद २१९;
भारत : पहिला डावः १२६३ षटकांत सर्वबाद ४०६;
ऑस्ट्रेलिया : दुसरा डावः१०५.४ षटकांत सर्वबाद २६१;
भारत : दुसरा डावः १८.४ षटकांत २ बाद ७५ (स्मृती मानधना नाबाद ३८, रिचा घोष १३, जेमिमा रॉड्रीग्स नाबाद १२; किम गर्थ १-१९, अँश्ले गार्डनर १-१८); सामनावीरः स्नेह राणा.