नवी दिल्ली – जागतिक महामारीच्या विरोधात जग निकराने लढत आहे. कोविड-19 हा केवळ शारीरिक आजार नव्हे, तर लोकांच्या जीवाला धोका आहे. यानिमित्ताने आपल्या अनारोग्यदायी जीवनशैलीकडे लक्ष गेले आहे. या काळात संपूर्ण मानवतेवर उपचार करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
डॉ. जोसेफ मार थोमा मेट्रोपॉलिटनच्या 90व्या वाढदिवसाच्या खास आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मोदी म्हणाले, आपल्या करोना योद्ध्यांच्या सहाय्याने भारत कोविड-19शी निकराने लढा देत आहे. या वर्षाच्या सुरूवातीला, काही लोकांचा असा अंदाज होता की, भारतात विषाणूचा परिणाम खूप तीव्र असेल. परंतु, टाळेबंदी आणि सरकारने केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे तसेच लोकांकडून लढ्याला बळ मिळाल्यामुळे इतर देशांपेक्षा भारत सुस्थितीत आहे. भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर देखील वाढत आहे.
कोविडमुळे किंवा अन्य कारणामुळे कोणतीही जीवितहानी दुर्दैवी आहे. मात्र कोविडमुळे भारतातील मृत्युदर प्रति लाख 12च्या खाली आहे. या संदर्भात सांगायचे झाले तर इटलीमधील मृत्यूचे प्रमाण दहा लाखांमागे 574 आहे. तसेच ब्रिटन, स्पेन आणि फ्रान्समधील आकडेवारीही भारतापेक्षा खूपच जास्त आहे.
त्याचबरोबर 130 कोटी भारतीयांचा आर्थिक विकास आणि समृद्धीवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. व्यापार आणि व्यवसायाची चाके सुरु व्हायला हवीत. शेती बहरली पाहिजे. गेल्या काही आठवड्यात केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेशी संबंधित अल्प-मुदतीच्या आणि दीर्घकालीन दोन्ही मुद्द्यांकडे लक्ष दिले आहे. समुद्रापासून अंतराळापर्यंत, शेतापासून कारखान्यांपर्यंत लोकांना अनुकूल आणि विकासाभिमुख निर्णय घेण्यात आल्याचे मोदींनी सांगितले.