मुंबई – राज्यात विधानपरिषदेचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. याचं कारण आहे राज्यपाल नामनियुक्त सदस्यांच्या रखडलेल्या नियुक्त्या. सरकारकडून आलेल्या शिफारशींवर तत्काळ मान्यता देण्याबाबत राज्यपाल अनुकूल नसल्याची माहिती समोर येत होती.
पुढील दोन महिने या नियुक्त्यांसाठी शिफारशी न पाठवण्याचे अप्रत्यक्ष संकेत राज्यपालांनी सरकारला दिलेत. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत राज्यपालांनी हा निरोप मुख्यमंत्र्यांना दिल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
राज्यपाल नामनियुक्त आमदारांची निवड लांबणीवर पडल्यामुळे सेना-भाजपची डोकेदुखी कमी झाल्याचे चित्र आहे. कारण करोनाच्या संकटाला तोंड देत असताना विधानपरिषदेच्या जागांवरून सुरू असलेली पक्षांतर्गत चुरस शिवसेनेला अडचणीची ठरणारी आहे. एकूण बारा रिक्त जागांपैकी शिवसेनेच्या वाट्याला चार जागा येणार आहेत.
यासाठी अनेक दिग्गजांकडून मातोश्रीवर फिल्डिंग लावायला सुरुवात झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने सचिन अहिर, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, अर्जुन डांगळे यांची नावं आघाडीवर आहेत. तर सुनील शिंदे, नितीन बानगुडे पाटील, विजय शिवतारे यांची नावेही चर्चेत आहेत. सद्यस्थितीत कोणाचाही नाराजी ओढवण्याच्या स्थितीत शिवसेना नसल्याने नियुक्तीसाठी होणारा विलंब सेनेच्या पथ्थ्यावर पडणारा आहे.
दुसरीकडे कॉंग्रेस पाच जागांसाठी अडून बसली आहे. यापूर्वी सुद्धा नऊ रिक्त जागांच्या विधानपरिषद निवडणुकीप्रमाणे कॉंग्रेस वाढीव जागेची मागणी करून आपल्या पदरात अधिकचे पाडून घेण्याचा आग्रह धरणार याची शिवसेनेला कल्पना आहे. यामुळे शिवसेनेने भाजपशी पडद्यामागे चर्चा सुरू ठेवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील या कुरकुरीमुळे भाजपला लांबचा फायदा दिसत असल्याने भाजपनेही याला प्रतिसाद दिल्याचे समजते.
विधानपरिषदेतील पक्षीय बलाबल?
राष्ट्रवादी कॉंग्रेस – 10
कॉंग्रेस – 8
शिवसेना – 14
भाजप – 23
लोकभारती – 1
शेतकरी कामगार पक्ष – 1
राष्ट्रीय समाज पक्ष – 1
अपक्ष – 6
रिक्त – 14
एकूण – 78