का कायद्यामुळे झालेल्या हिंसाचाराचा परिणाम
फेब्रूवारीत परिस्थितीत सुधारण्याची काहीशी आशा
दहशतीमुळे ऐन मोसमांत पर्यटकांनी फिरवली पाठ
नवी दिल्ली : सुधारीत नागरीकत्व कायदा विरोधी (का) झालेल्या हिंसक निदर्शनामुळे राज्यातील पर्यटनाच्या व्यवसायाला एक हजार कोटी रुपयांचा फटका बसेल, अशी भीती सरकारी सुत्रांनी व्यक्त केली.
आसामच्या पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष जयंत मल्ला बारूआ म्हणाले, या व्यवसायाला डिसेंबरमध्ये मोठा फटका बसला. जानेवारीतही याचा परिणाम जाणवत आहे. डिसेंबर ते मार्च हा खरं तर पर्यटनासाठी महत्वाचा काळ आहे. याच काळात झालेल्या निदर्शनामुळे या क्षेत्राला फटका बसला. आम्ही जानेवारी आणि डिसेंबरमध्ये सुमारे 500 कोटी रुपयांचा व्यवसाय गमावला.
केवळ देशांतर्गतच नव्हे तर परदेशी पर्यटकांनी आपल्या भेटी रद्द केल्या. अनेक देशांनी आसाममध्ये न जाण्याचा सल्ला नागरिकांना दिला. त्यामुळे त्याचा फटका पर्यटनाला बसला. हा परिणाम पर्यटन पोषक काळात झाल्याने त्याची तीव्रता वाढली. 2019 -20च्या पर्यटन मोसमांत सुमारे 30 टक्के व्यवसायात कपात होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. जानेवारीपासून या परिस्थितीत काहीसा बदल होईल, अशी अपेक्षा आहे.
का कायद्यात हिंदु, शिख, बौध्द, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समाजातील व्यक्तींना धार्मिक अल्पसंख्यांकत्वामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणीस्तानात अत्याचार सहन करावे लागत असतील तर त्यांना भारताचे नागरकित्व देण्याची त्यात तरतूद आहे.