केंद्रीय गिरीराज सिंह यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
नवी दिल्ली : विरोधी पक्ष आणि तुकडे तुकडे गॅंग हे महंमद अली जिना यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय नागरिकत्व सुची (एनआरसी) आणि सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या (का) मुद्द्यावर ते पाकिस्तानची भाषा वापरत आहेत, असे केंद्रीय मंत्री गिरीराक सिंह यांनी सांगितले.
सिंह हे केंद्रीय पशूधन विकास, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य खात्याचे मंत्री आहेत. ते म्हणाले, घुसखोरांना अभय देण्यासाठीच विरोधक का आणि एनआरसीला विरोध करत आहेत. मुगल आणि ब्रिटीशांनीही केल्या नसतील अशा गोष्टी ते करत आहेत, असे ते म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
या दुहेरी मुद्द्यांवर नागरिकांची दिशाभूल करून विरोधकांना देशात यादवी सदृश स्थिती निर्माण करायची आहे. जिनांच्या पावलावर चालत विरोधक पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. एएमआयएमचे प्रमुख असाउद्दीन ओवेसी आणि कॉंग्रेसला देशात 1947 सारखी काळी परिस्थिती आणायची आहे. मात्र जिनांच्या कल्पना आणि तत्वज्ञान देशात आता यशस्वी होणार नाही, असे सांगून ते म्हणाले, कॉंग्रेस, राजद, कम्युनिस्ट, एआयएमआयएम आणि तुकडे तुकडे गंघ यांना देशातील हिंदु आणि मुस्लिम यांच्यात पुन्हा विभाजन घडवायचे आहे.