प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 9 -शहरात जुलैमध्ये पहिल्या पावसात अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांत महापालिकेने रस्ते दुरूस्ती सुरू केली. मात्र, अनेक अंतगर्त रस्त्यांची दुरुस्ती पुन्हा तकलादू ठरली आहे. अनेक रस्त्यांवर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनांचा वेग मंदावला असून, मंगळवारी ठिकठिकाणी वाहतूक कोंडी दिसून आली.
जुलैमध्ये पहिल्या पंधरवड्यात दमदार झालेल्या पावसाने 20 जुलैनंतर विश्रांती घेतली. त्यानंतर महापालिकेने रस्ते दुरुस्ती हाती घेतली. त्यात जवळपास 15 हजारांहून अधिक खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली. तर, अजूनही दररोज 200 ते 300 खड्डे दुरूस्त केले जात आहेत. तर, आता गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने पुन्हा खड्डे पडले आहेत. सिंहगड रस्ता, कात्रज- कोंढवा रस्ता, मुंढवा रस्ता, कर्वे रस्ता, शिवाजी रस्ता, स्वारगेट परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेले असून महापालिकेने दुरूस्त केलेल्या खड्डयांवरचे डांबर आणि खडी या पावसाने निघून गेल्याने पुन्हा खड्डे पड्ले आहेत.
अजून दंडवसुलीही नाही
महापालिकेने गेल्या तीन वर्षांत केलेल्या व दोष दायित्व कालावधी (डीएलपी) असलेल्या 140 रस्त्यांची तपासणी केली. त्यात अनेक रस्त्यांवर निकृष्ट कामांमुळे खड्डे पडल्याने आढळून आले. परिणामी, महापालिकेने 11 ठेकेदारांना नोटीस बजावल्या. तसेच त्यांच्याकडून रस्त्यांची दुरूस्ती करून घेत प्रती खड्डा 5 हजारांचा दंड आकारला. पालिकेने आतापर्यंत जवळपास 7 लाखांचा दंड ठेकेदारांना केला आहे. पण, ठेकेदारांनी हा दंडही भरलेला नसताना पुन्हा नव्याने केलेली रस्ते दुरुस्तीची कामेही उखडली आहेत. तर खड्डयांना जबाबदार धरत पालिकेने आपल्या कार्यकारी अभियंत्यांनाही खड्डे प्रकरणी नोटीस बजावल्या होत्या. त्याचा खुलासाही अद्याप त्यांनी दिलेला नाही. तर, दुसऱ्या बाजूला नव्यांसह रस्ते झालेल्या ठिकाणीही खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे.
सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी
मंगळवारी पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक पुन्हा मंदावल्याचे दिसून आले. या रस्त्यावर आधीच उड्डणपूलाचे काम सुरू असून या रस्त्यावर पुन्हा दुरूस्त केलेल्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. परिणामी, वाहनांचा वेग मंदावलेला असून संतोष हॉल ते राजाराम पुलापर्यंत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. अनेकदा सिग्नल बंद पडत होते. काही वाहनचालक नियमभंग करत विरुद्ध दिशेने तसेच नो एन्ट्रीतून मार्ग शोधत होते. त्यामुळे कोंडीत आणखीच भर पडत आहे.