Mallikarjun Kharge On Narendra Modi – कठिण काळात कॉंग्रेस पक्षाची धुरा सांभाळणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिाकर्जुन खर्गे यंदाच्या निवडणुकीत विशेष उत्साहात असल्याचे दिसून येते आहे. आताची लोकसभा निवडणूक ही नरेंद्र मोदी विरूध्द देशातील जनता अशा स्वरूपाची असल्याचा दावा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे.
पंतप्रधानांनी नैराश्यातूनच मुसलमान, मंगळसूत्र, मुस्लिम लिग अशा खोट्या मुद्द्यांचा आधार घेत धृवीकरण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप खर्गे यांनी केला. एका हिंदी माध्यमाला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत खर्गे यांनी विरोधी पक्षांकडे निवडणुकीसाठी एक चेहरा नसल्यामुळे त्यांचे नुकसान होईल या दाव्याशी खर्गेंनी असहमती दर्शवली.
निवडणुकीनंतर आघाडीचा चेहरा कोण यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे मोदींची गॅरंटी हा विषय सोडला तर भारतीय जनता पार्टीकडे बोलायला मुद्दा कोणता आहे असा प्रश्न त्यांनी केला.
निवडणुकीत ज्या प्रकारचे आरोप होत आहेत त्यावरून खऱ्या मुद्द्यांवर राजकीय पक्षांचाच विश्वास राहीला नाही का असा प्रश्न विचारल्यावर खर्गे म्हणाले कॉंग्रेस पाच न्याय आणि २५ गॅरंटीच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधते आहे.
बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, महिलांना न्याय, वंचित- मागासवर्गा साठीच्या योजना, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही आवाज उठवतो आहे. आरोपांचे राजकारण तर भाजप आणि मोदी साहेब करत आहेत. ते ज्या प्रकारे भरकटले आहेत त्यावरून असे दिसते आहे की त्यांना निवडणुकीचा अंदाज आला आहे.
ते असे बोलत आहेत की देशाला स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले आहे आणि देशात जे काही झाले आहे ते त्यानंतरच झाले आहे. पहिल्या ६० वर्षांत कॉंग्रेस आणि अन्य पक्षांच्या सरकारांनी जे काही प्राप्त केले त्याला त्यांच्या दृष्टीने काहीच महत्व नाही.
ज्या गोष्टी किंवा आश्वासने आम्ही पूर्ण करू शकू तीच आश्वासने आम्ही दिली असल्याचे नमूद करून खर्गे म्हणाले, धोरणे आखणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे या बाबतीत कॉंग्रेस पक्षाच्या आसपासही येण्याची कोणाची क्षमता नाही याची देशातील जनतेला कल्पना आहे. पंतप्रधान आणि भाजपकडे प्रत्येक प्रकारचे साधन आज उपलब्ध असल्यामुळे ते कुठेही जाऊन बोलू शकतात. तथापि, त्यांनी किमान आमचे घोषणापत्र तरी वाचायले हवे होते.
त्यांनी तसे केले असते तर अशा निराधार टिप्पणी त्यांनी केल्या नसत्या असे खर्गे यांनी मोदी यांच्या मंगळसूत्र, संपत्तीचे वाटप आणि मुस्लिम लिग यासंदर्भातील आरोपांवर बोलताना सांगितले. आम्ही ना डावीकडे आहे ना उजवीकडे. जवाहरला नेहरू यांच्या काळापासून त्याच मध्यममार्गाने आमची वाटचाल सुरू आहे असेही त्यांनी नमूद केले.