हांगझोऊ :- आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या हॉकी स्पर्धेत भारत व दक्षिण कोरिया यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली. या सामन्यात स्ट्रायकर नवनीत कौरने निर्णायक क्षणी गोल करत बारताचा पराभव टाळला.
अर्थात या सामन्यातील बरोबरीनंतरही भारताच्या महिला संघाने अ गटात अव्वल स्थान कायम राखले आहे. यापूर्वीच्या साखळी लढतीत भारताच्या महिला संघाने सिंगापूरचा 13-0 असा धुव्वा उडवला होता, त्यामुळे भारताचे गुणतालिकेत वर्चस्व आबाधित राहिले आहे.
रविवारी झालेल्या कोरिया विरुद्धच्या लढतीत दोन्ही संघांनी जबरदस्त लढत दिली. कोरियाच्या चाओ हेजीनने 12 व्या मिनिटाला संघाचा गोल करत आघाडी घेतली होती. पहिला हाफ संपला तरीही भारताला बरोबरी करण्यात यश येत नव्हते. मात्र, त्याचवेळी नवनीत कौरने 44 व्या मिनिटाला गोल केला व सामन्यात बरोबरी प्राप्त करून दिली. यानंतर दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही व सामना 1-1 अशाच बरोबरीवर संपला.