मुंबई : शिवसैनिकांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर दोन दिवसापूर्वी हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर याच मुद्द्यावरून आज सकाळी किरीट सोमय्या पक्षाच्या शिष्टमंडळासोबत दिल्लीत पोहोचले आहेत. किरीट सोमय्या केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार असून शिवसेनेकडून भाजपा नेत्यांवर होणारे हल्ले, कारवाई यासंबंधी तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याच प्रकरणावर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
किरीट सोमय्यांच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, “गेल्या दोन वर्षात भाजपाचं शिष्टमंडळ सात वेळा केंद्रीय गृहसचिवांना भेटून आलं आहे. कायदा सुव्यवस्थेसंदर्भात काही प्रश्न असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना भेटायला हवं,” असे म्हटले. तसेच “काही माहिती दिली तरी हरकत नाही. उत्तर प्रदेशात गेल्या तीन महिन्यात १७ बलात्कार झाले आहेत. त्यासंबंधी कोणी गृहमंत्र्यांना माहिती देत असेल तर चांगलं आहे. राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एकत्र लावा”.
तसेच सोमय्यांच्या दिल्ली दौऱ्यावर संताप व्यक्त करत राऊत पुढे म्हणाले कि, “ही सगळी ढोंगं चालली आहेत. हे दोन चार लोक जातात, दिल्लीत उतरतात, पत्रकारांना भेटतात, महाराष्ट्राची बदनामी करतात. हे महाराष्ट्राच्या बदनामीचं षडयंत्र आहे. असंच सुरु राहिलं तर या महाराष्ट्रद्रोही लोकांना लोक चपला मारतील,” तसेच “संजय पांडे निष्पक्ष, प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांच्यावर उगाच असे आरोप करु नयेत” असेही राऊत म्हणाले.